IPL : स्पर्धेत 5-5 ओव्हरची मॅच कोणत्या स्थितीत? नियम काय? जाणून घ्या
IPL 2026 : आयपीएल स्पर्धेतील सामने हे 20 ओव्हरचे खेळवण्यात येतात. प्रत्येक संघाला 120 चेंडू खेळायला मिळतात. मात्र पाऊस आणि इतर कारणामुळे षटकं कमी केली जातात. सामना निकाली काढण्यासाठी किमान 5-5 ओव्हरची मॅच खेळवण्यात येते.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत अनेक सामने हे पावसामुळे आणि इतर कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत. पंच आणि सामनाधिकाऱ्यांकडून सामना निकाली काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. मात्र निसर्गापुढे कुणाचं काहीच चालत नाहीत. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचं स्पष्ट होतं तेव्हा नाईलाजाने सामना रद्द करण्यात येतो. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जातो. आयपीएलच्या 19 व्या मोसमात सोमवारी पावसामुळे पहिला सामना रद्द करावा लागला. इतकंच नाही तर सलग दुसरा सामनाही रद्द करावा लागतो की काय? असं चित्र होतं. मात्र सुदैवाने सामना निकाली निघाला.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील 6 एप्रलिचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तर मंगळवारी 7 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात पावसाने 160 मिनिटांचा खेळ वाया घालवला. पावसामुळे संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणँं अपेक्षित होतं. मात्र सामन्याला पावसामुळे रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात झाली. त्यामुळे 11 ओव्हरची मॅच खेळवण्यात आली. पावसाने प्रभावित झालेला हा सामना राजस्थानने जिंकला आणि विजयी हॅट्रिक पूर्ण केली.
5-5 ओव्हरचा सामना, नियम आणि अटी काय?
स्पर्धेत प्रत्येक संघासाठी एक एक सामना आणि 1-1 गुण अतिशय महत्त्वाचा असतो. या 1-1 गुणामुळे पॉइंट्स टेबलचं आणि प्लेऑफचं समीकरण बदलत असतं. त्यामुळे सामना निकाली निघावा यासाठी मॅच रेफरी आणि पंचांकडून पूर्ण प्रयत्न केले जातात. जेव्हा पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामन्यातील बराच वेळ वाया जातो तेव्हा किमान 5 षटकांचा सामना खेळवण्याचा शेवटचा पर्याय असतो. मात्र या 5 ओव्हरच्या सामन्यांसाठीही काही नियम आहेत. या नियमांबाबत आपण जाणून घेऊयात.
स्पर्धा कोणतीही असोत सामना ठराविक वेळेत पूर्ण व्हावा यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. मात्र काही वेळा पाऊस आणि इतर कारणांमुळे वेळ वाया जातो. तेव्हा सामना वेळेत निकाली निघावा यासाठी काही षटकं कमी केली जातात.
आयपीएल स्पर्धेत दुपारच्या सामन्याला साडे 3 तर संध्याकाळी होणाऱ्या मॅचला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होते. पाऊस आणि अपवादात्मक परिस्थितीत वेळ वाया गेल्यास आयपीएल स्पर्धेत कमीत कमी 5-5 ओव्हरचा सामना होऊ शकतो. मात्र त्यासाठी कट ऑफ टाईम आहे. कट ऑफ टाईमचं समीकरण आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. सामन्याचा कट ऑफ टाईम रात्री 11 असेल तर त्याआधी 5-5 षटकांच्या खेळाला सुरुवात होणं अपेक्षित असतं.
कट ऑफ वेळेआधी सामना सुरु करण्यासाठी आव्हान काय?
क्वचित अपवाद वगळता बहुतांश वेळा पावसामुळेच क्रिकेट सामन्याला वेळेत सुरुवात होत नाही. अशात 5-5 ओव्हरचा सामना खेळवण्याचा शेवटचा पर्याय असतो. मात्र सामना होण्यासाठी खेळपट्टी कोरडी असावी लागते. पावसामुळे खेळपट्टी आणि मैदान ओलं झालेलं असतं. त्यामुळे कट ऑफ टाईमआधी मैदान कोरडं असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे ग्राउंड स्टाफ कट ऑफ वेळेआधी मैदान कोरडं करण्यात यशस्वी ठरल्यास हा 5-5 षटकांचा सामना होऊ शकतो. तसेच कट ऑफ टाईमआधी सुरुवात न झाल्यास नाईलाजाने सामना रद्द करावा लागतो.