चौथ्या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे संतापला, पराजयाचं खापर असं फोडलं
आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची पराभवाची मालिका सुरू आहे. मधला सामना पावसामुळे रद्द झाला. पण पाच पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असताना कर्णधार अजिंक्य रहाणेचा संताप झाला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 22 व्या सामन्या कोलकाता नाईट रायर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.खरं तर या सामन्यात कोलकात्यावर विजयाचं दडपण होतं. सामन्यात झालंही तसंच.. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 32 धावांनी केकेआरला पराभवाची धूळ चारली. खरं तर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिलेलं लक्ष्य सहज गाठण्यासारखं होतं. दव पडला होता आणि केकेआरला त्याचा फायदा झाला असता. पण तसं झालं नाही. केकेआरचे फलंदाज एक एक करत बाद झाले आणि धावांचं अंतर वाढत गेलं. या पराभवानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेचं भाष्य समोर आलं आहे. यात त्याने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं आहे.
काय म्हणाला अजिंक्य रहाणे?
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभव होताच केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने फलंदाजांना पराभवासाठी जबाबदार ठरलं. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘मला वाटतं, गोलंदाजीमध्ये आम्ही खूप चांगली कामगिरी केली. या खेळपट्टीवर 190 धावांवर रोखणं ही खूप चांगली गोष्ट होती. विशेषतः पॉवरप्लेमध्ये त्यांनी 70 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या 190 पर्यंत रोखून धरणे हे आमच्या गोलंदाजी युनिटचे अप्रतिम काम होते. मला वाटतं, सुरुवातीला आमच्या फलंदाजीने पॉवरप्लेमध्ये फक्त 36 किंवा 37 धावा केल्या. मला वाटतं ते खूप महत्त्वाचं होतं. मधल्या टप्प्यात, फिरकी गोलंदाजांना फटके मारणे थोडे आव्हानात्मक होते, पण त्याव्यतिरिक्त, खेळपट्टी खरोखरच चांगली होती. आम्हाला एका फलंदाजाची गरज होती जो शेवटपर्यंत फलंदाजी करून शेवटी सामना जिंकून देईल.’
अजिंक्य रहाणे याने संघातील काही चुका सुधारणांबाबत सांगितलं की, ‘मला वाटतं, संघरचनेच्या बाबतीत, मागच्या आणि या सामन्यात जी संघरचना होती ती खूप चांगली होती. मला वाटतं सध्या परिस्थिती कठीण आहे. आम्ही सामने जिंकत नाहीये, हे कठीण आहे. एक गट म्हणून आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे की आपण सकारात्मक राहावे. आत्मविश्वास टिकवून ठेवावा आणि फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे.संघरचनेत आम्हाला काही बदल करावे लागतील. कधीकधी तुम्ही खेळाडूंना पाठिंबा देता, जर निकाल तुमच्या बाजूने लागत असतील, तर ते ठीक आहे. पण जर निकाल तुमच्या बाजूने लागत नसतील, तर तुम्हाला संघरचनेबद्दल विचार करावा लागेल. पण त्याव्यतिरिक्त, मला वाटतं की सकारात्मक राहणं आणि खचून न जाणं हेच महत्त्वाचं आहे.’