IPL 2026 Eliminator: रियान सामना खेळण्याचा स्थितीत नाही! हैदराबादविरुद्ध नाणेफेक गमवताच सर्वकाही उघड
आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर राजस्थानचा कर्णधार रियान परागने एक खुलासा केला आहे. त्यामुळे राजस्थानच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना म्हणजे करो या मरो… हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पॅट कमिन्स म्हणाला की, ‘आम्हाला त्याची फारशी चिंता नाही. आम्ही प्रथम फलंदाजी करून अनेक सामने जिंकले आहेत. हे मैदान धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगले वाटते. खरं तर, आम्ही नाणेफेक हरलो असतो तरी फारसा फरक पडला नसता. पण हो, आम्ही प्रथम गोलंदाजी करून पाहू.’ त्यानंतर समालोचकांनी रियान परागला त्याचं मत विचारलं. पण त्याने मत मांडताना एक बाब उघड केली. त्यामुळे संघासाठी संकटात टाकू शकते. रियान परागने सांगितलं की, सामना खेळण्याच्या स्थितीत नाही. या सामन्यासाठी फिट नाही तरीही खेळत आहे. रियान परागने सांगितलं की, त्याच्याकडे या शिवाय दुसरा पर्यायही नाही.
काय म्हणाला रियान पराग?
आयपीएल स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यापूर्वी रियान पराग म्हणाला की, ‘जर आम्ही नाणेफेक जिंकलो असतो, तर आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती, कारण हे मैदान धावांचा पाठलाग करण्यासाठी चांगले आहे. पण आम्ही या मैदानावर धावांचा पाठलाग केला आहे आणि त्यांचे रक्षणही केले आहे. खरे सांगायचे तर, मी खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही, पण आमच्याकडे जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी संघाच्या कामगिरीवर खूश आहे आणि जर आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न केला, तर आम्हाला येथेही चांगला निकाल मिळेल.’
रियान परागची कामगिरीवर प्रश्नचिन्ह
रियान पराग या स्पर्धेत काही सामन्यात खेळला नाही. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा यशस्वी जयस्वालने सांभाळली होती. पण एलिमिनेटर सामन्यात रियान परागने कर्णधारपद भूषवण्याचा निर्णय घेतला आणि मैदानात उतरला आहे. खरं तर अनफिट असताना असा निर्णय घेतल्याने संघासाठी त्रासदायक ठरू शकते. रियान परागच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. पण त्याची कामगिरी काही विशेष नव्हती. त्याने 12 डावात 24.72 च्या सरासरीने 272 धावा केल्या आहेत. त्यात त्याने दोन अर्धशतकं ठोकली आहे. एलिमिनेटर सामन्यात अनफिट असूनही कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.