IPL 2026 स्पर्धेत हा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी ठरला डोकेदुखी, चुकांमुळे सामना गमवण्याची वेळ
IPL 2026, MI vs PBKS: आयपीएल 2026 स्पर्धेतील 58व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्यात चार संधी मुंबई इंडियन्सने गमावल्या. त्यामुळे पंजाब किंग्सवर दबाव टाकण्याची संधी हातून गेली. यात नमन धीर हा मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरला.

Naman Dhir Dropped Catches In IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा गाशा आधीच गुंडाळला गेला आहे. त्यामुळे आता औपचारिक सामने खेळत आहे. अशा स्थितीतही मुंबई इंडियन्सची सुमार कामगिरी सुरू आहे. यात गचाळ क्षेत्ररक्षण हे सर्वात मोठी डोकेदुखी असल्याचं अधोरेखित झालं आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही असंच चित्र दिसून आलं. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर या सामन्यात सलग चार पराभवानंतर पंजाब किंग्स संघ दबावात होता. दुसऱ्या षटकात दबाव वाढवण्याची संधी चालून आली होती. पम नमन धीरने या स्पर्धेत केलेली चूक परत केली आणि सोपा झेल सोडला. या पर्वात नमन धीरचं क्षेत्ररक्षण मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरलं आहे. त्याच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मुंबई इंडियन्सच्या हातून दबावाची संधी गेल्याचं दिसून आलं आहे.
नमन धीरने सोपा झेल सोडला
पंजाब किंग्सविरुद्च्या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने हाती दुसरं षटक घेतलं. या षटकात एक सोपा झेल नमन धीरने सोडला. जसप्रीत बुमराहने बॅक ऑफ लेंथ चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला. त्यावर प्रभसिमरन सिंगने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पण बॅटचा किनारा लागून थेट स्लिपला उभ्या असलेल्या नमन धीरच्या हाती गेला. पण हा सोपा झेल पकडण्यात नमन धीरला अपयश आलं. जसप्रीत बुमराह देखील गचाळ क्षेत्ररक्षण पाहून संतापलेला दिसला. एक तर जसप्रीत बुमराहसाठी हे पर्व काही खास गेलं नाही. विकेट मिळणं कठीण झालं आहे. त्यात असा चूक होत असल्याने संताप होणं सहाजिकच आहे.
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) May 14, 2026
या पर्वात नमन धीरने एकूण 7 झेल सोडले. आयपीएल स्पर्धेत एखाद्या खेळाडूने सोडलेले सर्वाधिक झेल आहेत. यापूर्वीही नमन धीरचं क्षेत्ररक्षण पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. त्यात या पर्वात मुंबई इंडियन्सने एकूण 11 झेल सोडले आहेत. संपूर्ण हंगामात मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण सुमार राहिली. खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी झेल सोडल्याने त्याचा थेट परिणाम सामन्यांच्या निकालांवर झाला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आता आपल्या क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे.