RR vs MI: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामना होणार रद्द? कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 13व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघ आमनेसामने येणार आहे. पण हा सामना होईल की नाही हे सांगणं आता कठीण झालं आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

RR vs MI: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामना होणार रद्द? कारण की...
RR vs MI: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामना होणार रद्द? कारण की...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 07, 2026 | 4:44 PM

RR vs MI Match Weather Forecast: आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. कारण जसप्रीत बुमराह आणि वैभव सूर्यवंशी हे द्वंद्व या सामन्यात पाहायला मिळणार आहे. असं असताना हा सामना होईल की नाही याबाबत आता साशंकता आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स होमग्राउंड असलेल्या गुवाहाटीत होणार आहे. त्यामुळे हा सामन्यावर रद्द होण्याचं सावट आहे. यापूर्वी 12व्या सामन्यात पावसाचं सावट आलं होतं. त्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात फक्त 22 चेंडूंचा खेळ झाला. असं असताना दुसरा सामना रद्द होणार या चर्चेने क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. पण या सामना हा रद्द होण्याचं कारण पाऊस नाही तर भलतंच असू शकते. हवामान खात्याकडून तसा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आयपीएलचा 13वा सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पण पाऊस तर लगेच जाईल. पण वादळी वारा आणि वीज कोसळण्याची भीती आहे. हवामान खात्याने गुवाहाटीत मंगळवारी यलो अलर्ट जारी केला आहे. गुवाहाटीत वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तसेच वीजही कडाडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यावेळीच असं घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना सुरळीत पार पाडण्यात अडचणी येऊ शकतो. हा सामना थांबवण्याची वेळही येऊ शकतो. आता हा सामना पूर्ण होणार की नाही हे त्या वेळेलाच स्पष्ट होईल.

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सला हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील निकालामुळे गुणतालिकेवर प्रभाव पडणार आहे. मुंबई इंडियन्सने मागच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे हा सामना काहीही करून जिंकावं लागेल. तसेच राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकून टॉप 4 मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. राजस्थान रॉयल्स या गुणासह पहिलं स्थान गाठेल. पण पुढे जाऊन एक गुण कमी मिळाल्याने चुरस वाढेल. तर मुंबईच्या हातून एक गुण गेल्याने गुणतालिकेत आरसीबी, दिल्ली आणि राजस्थान रॉयल्सची बरोबरी करण्याची संधी जाईल.

Follow Us