राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात इशान किशनने विकेटकीपिंग का केली नाही? स्वत:च सांगितलं कारण

आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना सनरायझर्स हैदराबादने 57 धावांनी जिंकला. या सामन्यात इशान किशनच्या कर्णधारपदाचं कौतुक केलं जात आहे. एक तर फलंदाजीत सावरलं आणि नंतर कर्णधारपद भूषवत योग्य ते निर्णय घेतले. या सामन्यात त्याने विकेटकीपिंग केली नाही. असं का ते त्याने स्वत: सांगितलं.

राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात इशान किशनने विकेटकीपिंग का केली नाही? स्वत:च सांगितलं कारण
राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात इशान किशनने विकेटकीपिंग का केली नाही? स्वत:च सांगितलं कारण
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 14, 2026 | 4:04 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 21 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडले. या सामन्यापूर्वी खरं तर राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा होता. पण सामन्यात सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली. सनरायझर्स हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण त्यानंतर इशान किशनने डाव सावरला. त्याने 44 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकार मारत 91 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे संघाला 200 पार धावा करण्यास मदत झाली. तर या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघ 159 धावा करू शकला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 57 धावांनी जिंकला. या सामन्यातील राजस्थानच्या डावात इशान किशनने विकेटकीपिंग करणं टाळलं. तसेच सलील अरोराकडे ही जबाबदारी सोपवली. इशान किशनच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याने असं का केलं याचं कारण त्याने सांगितलं.

आयपीएलमधील हा सामना संपल्यानंतर समालोचकांनी इशान किशनला विकेटकीपिंग न करण्याचं कारण विचारलं. तेव्हा इशान किशनने सांगितलं की, ‘मला वाटतं, एक कर्णधार म्हणून मला जाणवलं की, काही गैरसमज होत होता. कधीकधी यष्टीरक्षण करताना वेळ नसतो. तुमच्या गोलंदाजांना योजना काय आहेत हे तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे तिथे उपस्थित राहून, ते काय गोलंदाजी करणार आहेत यावर त्यांच्याशी चर्चा करणं चांगलं असतं, जेणेकरून आम्ही त्यानुसार क्षेत्ररक्षण लावू शकू. आणि तीच योजना होती आणि मला वाटतं की ती आमच्यासाठी खूप चांगली यशस्वी ठरली.’पुढेही असंच होणार आहे का? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा इशानने सांगितल की, असं असेल अशी आशा आहे.

इशान किशनने विजयाचं श्रेय गोलंदाजांना दिलं आणि म्हणाला, या विजयामुळे नक्कीच खूप आनंद झाला आहे, यामुळे गुणतालिकेत 2 गुणांची भर पडली आहे. मला खूप आनंद झाला कारण गोलंदाजांकडून आम्हाला हीच अपेक्षा होती की त्यांनी इथे येऊन मुक्तपणे खेळावे आणि आपल्या योजनांची अंमलबजावणी करावी. मला वाटते की आज आम्ही तेच केले आणि याचे श्रेय सर्व गोलंदाजांना जाते.

Follow Us