
IND vs PAK Final: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, तो भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 146 धावांवर ऑलआऊट केले आहे. साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी पाकिस्तानला चांगली सलामी दिली होती, मात्र भारतीय फिरकी गोलंदाजांपुढे इतर फलंदाजांनी गुढगे टेकले. कुलदीप यादवने भारताकडून चमकदार कामगिरी करत 4 विकेट्स घेतल्या. यासह कुलदीपने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात कुलदीप यादवचा कहर पहायला मिळाला. कुलदीप यादवने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 30 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या फिरकीमुळे पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. कुलदीप गोलंदाजीला आला तेव्हा पाकिस्तानचे फलंदाज चांगली फलंदाजी करत होते. मात्र त्यानंतर कुलदीपने शानदार गोलंदाजी केली. कुलदीपने सॅम अयुब, सलमान अली आघा, शाहीन आफ्रिदी आणि फहीम अश्रफ यांच्या विकेट्स घेतल्या. आजच्या 4 विकेट्ससह कुलदीप आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.
कुलदीप यादवने आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला आहे. कुलदीपच्या नावावर आता आशिया कपमध्ये एकूण 35 विकेट्स झाल्या आहेत. मलिंगाने आशिया कपमध्ये 32 विकेट्स घेतल्या होत्या. आता कुलदीप यादव आशिया कपच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर बनला आहे. भविष्यात विकेट्सची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली. कुलदीपच्या 4 विकेट्सशिवाय वरुण चक्रवर्तीने 4 ओव्हर्समध्ये 30 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलनेही 4 ओव्हर्समध्ये 26 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. भारताचा स्टार बॉलर जसप्रित बुमराहनेही या सामन्यात 2 विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव 146 धावांवर गुंडाळण्यास हातभार लावला. पाकिस्तानकडून साहेबजादा फरहानने सर्वाधिक 57 आणि फखर झमानने 46 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय इतर फलंदाजांनी निराशा केली.