T20 World Cup : महेंद्रसिंग धोनी…. कोणत्याही कठीण परिस्थितीत शांत डोक्याने प्रतिस्पर्धी संघांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा याचं नियोजन करण्यात माहिर… अनेक मातब्बर संघांनी त्याच्या करेक्ट कार्यक्रमाचा अनुभव घेतलाय… धोनीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकवून देताना आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफीज भारताला मिळवून दिल्यात. धोनीमुळे भारतवासियांना अनेक सोनेरी क्षण अनुभवायला मिळाले, त्याचं साक्षीदार होता आलं. अगोदर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतलेल्या धोनीने भारताच्या 74 व्या स्वातंत्रदिनी क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली… ‘तो कधीतरी पुन्हा येईल’ अशी अपेक्षा अनेकांना होती… अखेर तो पुन्हा आलाय… भारतीय संघात त्याचं कमबॅक झालंय… पण तो संघात आलाय नव्या भूमिकेत….. टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने बुधवारी रात्री भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये 15 सदस्यीय संघाबरोबर आणखी एक मोठी घोषणा होती, ती घोषणा आहे MS धोनी भारतीय टी ट्वेन्टी संघाचा मेन्टॉर असेल. विराट-रवी शास्त्री यांची जोडी असताना धोनीकडे विशेष जबाबदारी देण्याचं कारण काय?, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने याचं नेमकं उत्तर दिलं आहे. (MS Dhoni Ability to Handle Pressure Thats Why Give mentor Resposibility Says gautam gambhir)
“कठीण दबावाच्या परिस्थितीत धोनीच्या रणनितीचा संघाला फायदा होईल. धोनीचा अनुभव आणि त्याची दबावातली आतापर्यंतची कामगिरी सरस आहे. त्याला दबावात कशी परिस्थिती हाताळायची याची जाणीव आहे. याचाच फायदा भारतीय संघाला होणार आहे. त्याचं मेन्टॉर बनण्याचं मुख्य कारण हेच आहे की भारतीय संघाने दबावात असताना धोनीच्या कौशल्य आणि अनुभवाचा वापर करता यावं, त्याचा तोच रोल असेल…”, असं गंभीर म्हणाला.
गंभीर म्हणाला, “जर भारताला टी -20 मध्ये संघर्ष करावा लागला असता तर त्यांना बाहेरून कोणाची गरज भासली असती, परंतु धोनीचा अनुभव आणि कठीण परिस्थितीत त्याचा दबाव हाताळण्याची मानसिकता हे त्याला एक मार्गदर्शक म्हणून का घ्यावे याचे एक कारण असू शकते. कौशल्याचा दृष्टिकोन म्हणावा तर या संघातल्या खेळाडूंकडे मैदानावर उत्तम कामगिरी करण्याची सर्व कौशल्ये आहेत. धोनीचं मेन्टॉर बनण्याचं कारण कदाचित दडपणाची परिस्थिती कशी हाताळावी हे असेल.”
“कारण भारत महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे – विशेषतः बाद फेरीच्या सामन्यांमध्ये. त्यामुळे अशा परिस्थितीत धोनीचा अनुभव युवा खेळाडूंसाठी फायदेशीर ठरु शकतो. आपल्याला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की बहुतेक खेळाडू तरुण आहेत.”, असंही गंभीर म्हणाला.
हे ही वाचा :
T20 World Cup : BCCI ची मोठी घोषणा, MS धोनीचं टीम इंडियात कमबॅक, भारताला पुन्हा विश्वविजेता बनविणार?