टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदी रवी शास्त्री! अजित आगरकर यांचा राजीनामा? खरं काय ते जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघाला नवीन मुख्य निवडकर्ता मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या चर्चेत रवी शास्त्री यांचं नाव पुढे येत आहे. पण खरंच तसं आहे का? अजित आगरकर राजीनामा देणार का? असे सर्व प्रश्न क्रीडाप्रेमींना पडलेत.

टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदी रवी शास्त्री! अजित आगरकर यांचा राजीनामा? खरं काय ते जाणून घ्या
टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदी रवी शास्त्री! अजित आगरकर यांचा राजीनामा? खरं काय ते जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 20, 2025 | 5:52 PM

भारतीय संघात कोणाची निवड करायची? कोण योग्य अयोग्य ठरवण्याच्या नाड्या या निवड समितीच्या हातात असतात. निवड समितीचं लक्ष देशांतर्गत क्रिकेट, खेळाडूंचा फिटनेस आणि फॉर्मवर असतं. त्यानुसार खेळाडूंची निवड केली जाते. त्यामुळे निवड समितीवर खेळाडूंची निवड करताना दबाव असतो. जुलै 2023 पासून ही धुरा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर सांभाळत आहे. मात्र आता दोन वर्षानंतर त्याच्या राजीनाम्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उत आलं आहे. रवी शास्त्री लवकरच अजित आगरकर यांची जागा घेतली असं बोललं जात आहे. पण सोशल मीडियावर रंगलेल्या या चर्चेत किती तथ्य ते जाणून घेऊयात. ही अफवा आहे की खरं तसंच घडणार याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

सोशल मीडियावर चर्चेचं विश्लेषण करण्यापूर्वी या चर्चा अफवा असल्याचं लक्षात ठेवा. त्यामुळे त्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. व्हायरल होत असलेल्या चर्चांची तपासणी केल्यानंतर ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं समोर आल आहे. कारण बीसीसीआय इतक्या मोठ्या पदाच्या नियुक्तीसाठी अधिकृत घोषणा करते. सध्या तरी बीसीसीआयने मुख्य निवडकर्त्याच्या नियुक्तीसाठी कोणतीही घोषणा केलेली नाही. तसेच या चर्चांवर रवी शास्त्री यांनीही कोणतंही भाष्य केलेलं नाही. अजित आगरकर यांनी या प्रकरणावर काहीच बोलले नाही. त्यामुळे या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे.

रवी शास्त्री यांनी यापूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता चार वर्षानंतर मुख्य निवडकर्ते म्हणून टीम इंडियासोबत येणार अशा अफवा उडाल्या आहेत. सध्या तरी अजित आगरकर या पदावर कायम असतील. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी अजित आगरकर यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली होती. जवळपास दोन वर्षे ते ही भूमिका पार पाडत आहे.

दरम्यान, मुख्य निवडकर्ता असणं कठीण काम असल्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. भारतात खूप प्रतिभा आहे आणि त्यातून खेळाडूंची निवड करणं कठीण काम आहे. दरम्यान अजित आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभर तरी या पदासाठी चर्चा होणार नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर कदाचित हालचाली सुरु होऊ शकतात.