विराट कोहली आयपीएलमधून निवृत्ती कधी घेणार हे ठरलं! सहकारी खेळाडूने केला मोठा खुलासा

विराट कोहली हे भारतीय क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे. विराट कोहलीने गेली अनेक वर्षे क्रिकेट मैदानात विक्रमांचा धडाला लावला आहे. पण टी20 आणि कसोटी संघातून निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला. आता आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.

विराट कोहली आयपीएलमधून निवृत्ती कधी घेणार हे ठरलं! सहकारी खेळाडूने केला मोठा खुलासा
विराट कोहली आयपीएलमधून निवृत्ती कधी घेणार हे ठरलं! सहकारी खेळाडूने केला मोठा खुलासा
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 23, 2025 | 5:55 PM

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 आणि कसोटी फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर वनडे सामने खेळणार आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत फलंदाजी करताना पाहता येणार आहे. विराट कोहली वनडे फॉर्मेटमधून वर्ल्डकप 2027 नंतर निवृत्ती घेईल अशी क्रीडाप्रेमी चर्चा करत आहेत. तर आयपीएल स्पर्धेत तो आणखी काही वर्षे आरामात खेळेल अशी चर्चा आहे. मागच्या पर्वात विराट कोहलीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याच्या खेळीमुळे आरसीबीने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं. विराट कोहलीने मागच्या पर्वात 600 हून अधिक धावा केल्या होत्या. आता पुढच्या पर्वात त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना आरसीबी संघातील सहकारी खेळाडूने विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत मोठी गोष्ट सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. हा खुलासा आरसीबीचा क्रिकेटपटू स्वास्तिक चिकारा याने केला आहे.

आरसीबीकडून खेळणाऱ्या स्वास्तिक चिकाराने रेवस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘आयपीएल 2025 स्पर्धेदरम्यान विराट कोहलीने सांगितलं होतं की जिथपर्यंत पूर्णपणे फिट आहे तिथपर्यंत खेळणार. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार नाही. मी वाघासारखं खेळेन. मी पूर्ण 20 षटकं फिल्डिंग करेल आणि फलंदाजीसाठीही उतरणार. ज्या दिवशी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळेल. त्या दिवशी मी क्रिकेटला रामराम ठोकेन.’ आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम 2023 पासून लागू केला आहे. या नियमानुसार प्रत्येक संघ पाच खेळाडूंची राखीव म्हणून नियुक्ती करते. टीम आपल्या गरजेनुसार या खेळाडूंचा गोलंदाजी किंवा फलंदाजीसाठी वापर करतात.

विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासून आरसीबीचा भाग आहे. त्याने या स्पर्धेत 267 सामने खेळले असून 39.55 च्या सरासरीने आणि 132.86 च्या स्ट्राईक रेटने 8661 धावा केल्या आहेत. यात विराट कोहलीने 8 शतकं आणि 63 अर्धशतकं ठोकली आहे. आयपीएलमध्ये 113 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांना त्याला पुन्हा मैदाना पाहण्याची उत्सुकता आहे. आता ही संधी ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघ वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली असण्याची शक्यता आहे.