टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी रियान परागचा पर्याय खुला, 11 चौकार-षटकार मारत ठोकला दावा

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अवघ्या काही तासात सुरुवात होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाचं दुखापतीमुळे टेन्शन वाढलं आहे. असं असताना रियान परागने दुखऱ्या जखमेवर मलम लावला आहे. टीम इंडियाकडे एक पर्याय खुला झाला आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी रियान परागचा पर्याय खुला, 11 चौकार-षटकार मारत ठोकला दावा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी रियान परागचा पर्याय खुला, 11 चौकार-षटकार मारत ठोकला दावा
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 06, 2026 | 7:41 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. दुसरीकडे, दिलासादायक चित्रही आहे. खरंच स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तिलक वर्मा, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता. आता स्पर्धेला काही तास शिल्लक असताना हर्षित राणाबाबत वाईट बातमी आली. तिलक वर्मा फिट अँड फाईन होऊन संघात परतला आहे. वॉशिंग्टन सुंदरचं अजून काही कळलेलं नाही. तर हर्षित राणा स्पर्धेला मुकला आहे. हर्षित राणाच्या जागी मोहम्मद सिराज खेळेल असं सांगितलं जात आहे. पण वॉशिंग्टन सुंदरचं काय? असा प्रश्न पडला आहे. त्याचं उत्तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सराव सामन्यात मिळालं आहे. बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस ग्राउंड 1 वर भारत ए विरुद्ध नामिबिया सामना झाला. या सामन्यात रियान परागची बॅट तळपली. भारताची सुरुवात काही चांगली झाली नव्हती. पण रियान परागने डाव सावरला आणि आक्रमक फटकेबाजी केली.

रियान परागचा पर्याय तयार

रियान परागला पहिल्या वॉर्मअप सामन्यात काही खास करू शकला नव्हता. तेव्हा नाबाद 2 धावा करून तंबूत परतला होता. पण या सामन्यात त्याने संधीचं सोनं केलं. त्याच्या या खेळीमुळे त्याला टी20 वर्ल्डकप संघात संधी मिळू शकते. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण तो अजूनही फिट झालेला नाही. रियान परागने या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. रियाने फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाची स्थिती काही चांगली नव्हती. रियान परागने 39 चेंडूत 69 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 176.92 चा होता. यात त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले. रियान परागच्या या खेळीमुळे इंडिया ए संघाने 20 षटकात 8 गडी गमवून 197 धावा केल्या.

रियान परागसह या सामन्यात नमन धीर आणि आशुतोष शर्मा यांनी चांगली फलंदाजी केली. नमन धीरने 29 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने 1 चौकार आणि 1 षटकार मारला. तर आशुतोष शर्माने 21 चेंडूत 35 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. पण या दोघांपेक्षा रियान पराग उजवा ठरला आहे. रियान परागला आता नशिबाची साथ मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.