रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याचं खरं कारण आलं समोर! रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

वेस्ट इंडिज कसोटी मालिका पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड केली आहे. पण रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. असं का केलं त्या मागचा खुलासा आता झाला आहे.

रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याचं खरं कारण आलं समोर! रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्याचं खरं कारण आलं समोर! रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 06, 2025 | 4:40 PM

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात वनडे संघाचं कर्णधारपद शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. संघात रोहित शर्मा असूनही कर्णधारपदाची माळ शुबमन गिलच्या गळ्यात घातली आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर आता शुबमन गिलच्या हाती संघाची सूत्र असणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळणार आहेत. पण शुबमन गिलकडे सूत्र सोपवल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढण्याचं कारण काय? असा प्रश्न विचारला जात आहे. शुबमन गिलकडे वनडे संघाची धुरा सोपवताना टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितलं होतं की, तिन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कर्णधार निवडणं शक्य नाही. पण आता टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे.

रोहित शर्मा आपल्या मर्जीने संघाची धुरा सांभाळणं निवडकर्त्यांना आवडलं नाही, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये खुलासा केला आहे. संघातील वातावरण यामुळे खराब होऊ शकते अशी भिती निवडकर्त्यांना वाटत होती. बीसीसीआयच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, रोहित शर्मासारखा मोठा खेळाडू ड्रेसिंग रुम आपल्या पद्धतीने चालवू इच्छित असेल, त्याचा संघाच्या खेळाडूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. इतकंच काय तर रिपोर्टमध्ये पुढे खुलासा केला की, गौतम गंभीरची नव्या प्रशिक्षकपदी निवड केल्यानंतर त्याने सुरुवातीचे सहा महिने मागे राहून काम केलं. तसेच जास्त हस्तक्षेप केला नाही. पण रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली न्यूझीलंडविरुद्ध मायदेशी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी गमावल्यानंतर गौतम गंभीर सक्रिय झाले. त्यांनी संघातील प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा खेळताना दिसणार आहे. या मालिकेतील कामगिरीवर रोहित शर्माचं पुढचं भविष्य ठरणार आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. कदाचित रोहित शर्माच्या कारकि‍र्दीची शेवटची मालिकाही ठरू शकते. काही क्रीडातज्ज्ञांच्या मते रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्डकप खेळू इच्छित आहे. पण त्याला फॉर्म आणि फिटनेस कायम ठेवावं लागणार आहे.