टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठी साईराज बहुतुलेचं नाव चर्चेत! बीसीसीआय असा निर्णय घेणार कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा सुरू होतील. पण असं होत असताना टीम इंडियाच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये काही बदल होणार आहेत. साईराज बहुतुले टीम इंडियाच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये रूजू होणार असल्याची माहिती आहे. त्याची भूमिका काय असणार? असा निर्णय घेण्याचं कारण काय? जाणून घेऊयात..

टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठी साईराज बहुतुलेचं नाव चर्चेत! बीसीसीआय असा निर्णय घेणार कारण की...
टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठी साईराज बहुतुलेचं नाव चर्चेत! बीसीसीआय असा निर्णय घेणार कारण की...
Image Credit source: PTI
| Updated on: May 08, 2026 | 4:36 PM

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होईल. वनडे वर्ल्डकप स्पर्धेची तयारीकडे लक्ष दिलं जाईल. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी धडपड असणार आहे. तसेच 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जाईल. असं असताना टीम इंडियात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवलं जाऊ शकते. पण हा इतकाच बदल नाही तर कोचिंग स्टाफमध्येही काही बदल दिसून येतील. रिपोर्टनुसार, टीम इंडियाला साईराज बहुतुलेच्या नावाने नवा प्रशिक्षक मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत.

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ माजी फिरकीपटू साईराज बहुतुलेला टीम इंडियाच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये दाखल करण्यासाठी आग्रही आहे. साईराज बहुतुलेने टीम इंडिया आणि मुंबई क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. पंजाब किंग्स संघातही त्याने प्रशिक्षकपदाची भूमिका योग्य प्रकारे बजावली आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियात फिरकी बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी बीसीसीआयने साईराज बहुतुलेसोबत चर्चाही केली आहे. इतकंच काय तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत त्याची चर्चाही झाली आहे. त्यानंतर साईराज बहुतुलेला प्रशिक्षक स्टाफमध्ये घेण्यावर सहमती झाली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत साईराज बहुतुले पंजाब किंग्सचा फिरकी बॉलिंग कोच आहे. त्याचं प्रशिक्षण पाहून गौतम गंभीर प्रभावित झाले आहेत. यापूर्वी बहुतुलेने राजस्थान रॉयल्सला कोचिंग दिलं आहे. तसेच नॅशनल क्रिकेट अकादमीत फिरकी प्रशिक्षण दिलं आहे. या दरम्यान वेगवेगळ्या क्रिकेट मालिकांमध्ये टीम इंडियासोबत दिसला आहे. त्यामुळे त्याच्याकडे प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव आहे. टीम इंडियाच्या एकंदरीत वातावरणाबाबत त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे त्याची निवड झाल्यास टीम इंडियाला फायदा होईल. पण यासाठी त्याला पंजाब किंग्सला सोडचिठ्ठी द्यावी लागेल.

बीसीसीआय असा निर्णय का घेणार?

टीम इंडियाला सध्या एका चांगल्या फिरकीपटूची गरज आहे. कारण कसोटी फॉर्मेटमध्ये त्याची उणीव दिसून आली आहे. मागच्या एक दशकात आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने ही धुरा सांभाळली. पण आता आर अश्विन निवृत्त झाला आहे. तसेच रवींद्र जडेजाचा प्रभाव तितका राहिला नाही. त्यामुळे फिरकीपटूची उणीव भासत आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा फटका बसला. बहुतुलेवर नवा फिरकीपटू तयार करण्याची जबाबदारी असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us