‘शुबमन गिलसाठी संजू सॅमसनला बाहेर बसवलं’, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियातून संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलं आहे. यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे तर्कवितर्क बांधले जात आहेत. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सदगोपन रमेश याने यासाठी वेगळाच तर्क बांधत टीकास्त्र सोडलं आहे.

शुबमन गिलसाठी संजू सॅमसनला बाहेर बसवलं, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
'शुबमन गिलसाठी संजू सॅमसनला बाहेर बसवलं', माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 07, 2026 | 8:24 PM

झिम्बाब्वे मालिकेसाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मात्र या संघात इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या संजू सॅमसनचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात असलेल्या संजू सॅमसनला कसं काय वगळलं जाऊ शकतं? टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संजू सॅमसनने चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला जेतेपदाची चव चाखता आली होती. त्यामुळे वर्ल्डकप विजेत्या हिरोला असं वगळल्याने संतापाची लाट उसळली आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सदगोपन रमेश याने मोठा आरोप केला आहे. सदगोपन रमेशच्या मते, टीम इंडिया शुबमन गिलला पुन्हा एकदा टी20 संघात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे संजू सॅमसनला बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप सदगोपन रमेशने केला आहे. पण त्याने असा खळबळजनक आरोप करण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात..

संजू सॅमसनला बाहेर केल्यानंतर सदगोपन रमेश म्हणाला…

सदगोपन रमेशने आपल्या युट्यूब चॅनेलवर या घटनेचं विश्लेषण करताना सांगितलं की, ‘सॅमसनला संघात स्थान न देणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. अनेक लोक याकडे प्रभसिमरन सिंगला संधी देण्याचा प्रयत्न म्हणून पाहतील, पण मी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. या लोकांना हे थेटपणे करायचे नाही, पण शुभमन गिलला टी20 संघात परत आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.’ सदगोपन रमेशच्या आश्चर्यकारक विधानामुळे पुन्हा चर्चा रंगली आहे. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी शुबमन गिलला संघातून वगळण्यात आलं होतं. कारण गेल्या वर्षात त्याने 15 टी20 सामने खेळले आणि त्याची सरासरी 25पेक्षा कमी होती. उपकर्णधार असूनही त्याला वगळण्यात आलं होतं.

शुबमन गिलचा विचार का केला जात आहे?

शुबमन गिलने आयपीएल 2026 स्पर्धेत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. त्याने 45.75 च्या सरासरीने आणि 160 पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने 732 धावा केल्या. त्याच्या याच कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने अंतिम फेरी गाठली होती. पण आरसीबीकडून अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्याच्या या कामगिरीमुळेच सदगोपन रमेश याने अंदाज बांधत सांगितलं की, भारतीय संघ व्यवस्थापन वनडे आणि कसोटी कर्णधार असलेल्या शुबमन गिलला टी20 संघात आणण्यासाठी उत्सुक आहे.

Follow Us