
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचायचं तर भारताला वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकणं भाग आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजला 160-170 धावांवर रोखू असं वाटलं होतं. पण गणित चुकलं. वेस्ट इंडिजने या सामन्यात 20 षटकात 4 गडी गमवून 195 धावा केल्या. तसेच विजयासाठी 196 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाला प्रति षटक 10 धावांचं एव्हरेज होता. त्यामुळे टीम इंडियावर आधीच दडपण होतं. त्यात हा महत्त्वाचा सामना असल्याने अतिरिक्त तणाव होता. असं असताना अभिषेक शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र या तिघांनी महत्त्वाच्या सामन्यात भ्रमनिरास केला. समोर विशालकाय स्कोअर असताना मोक्याच्या क्षणी विकेट टाकल्या. अभिषेक शर्मा 10, इशान किशन 10 आणि सूर्यकुमार यादव 18 धावा करून बाद झाले. पण एका बाजूने संजू सॅमसनने किल्ला लढवला.
संजू सॅमसन या धावांचा पाठलाग करताना एकटाच झुंज देत असल्याचं दिसलं. त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. प्रत्येक चेंडूवर योग्य दिशेने प्रहार करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यात त्याला यशही मिळालं. महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसनने अर्धशतक ठोकलं. संजू सॅमसनने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 203.85 चा होता. त्यानंतरही संजू सॅमसनने फलंदाजी सुरूच ठेवली. टीम इंडियाला विजयाच्या वेशीवर आणायचं तर खेळपट्टीवर टिकणं महत्त्वाचं होतं. त्या अनुषंगाने त्याने फलंदाजीचा गिअर बदलला.
संजू सॅमसनचा टी20 वर्ल्डकपपूर्वीचा फॉर्म पाहता त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा नव्हती. अभिषेक शर्माची तब्येत खराब झाली आणि त्याला नामिबियाविरुद्ध संधी मिळाली. त्यात काही खास करू शकला नाही. त्यानंतर सुपर 8 फेरीत भारताचा दक्षिण अफ्रिकेकडून दारूण पराभव झाला. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात संजूला जागा मिळाली. त्यात त्याने चांगली सुरूवात करून दिली होती. त्याचा फायदा त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात झाला. त्याने या सामन्यात अर्धशतक ठोकलं. संजू सॅमसनने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अर्धशतक ठोकलं आहे.