
आशिया कप 2025 स्पर्धेतील भारतीय संघाची खेळी पाहता त्यांना रोखणं कठीण आहे. भारताने आतापर्यंत सर्व सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच अंतिम फेरीतील स्थानही जवळपास पक्कं केलं आहे. भारतीय फलंदाज विरोधी संघावर अक्षरश: तुटून पडतात. एखाद दुसरा फलंदाज बाद झाला तरी काही फरक पडत नाही. कारण भारतीय फलंदाजीत खोली आहे. तळाचे फलंदाजही फटकेबाजी करू शकतात इतकी ताकद आहे. असं असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला भारतीय संघात कमकुवत बाजू दिसली आहे. शोएब अख्तरच्या मते, भारतीय संघात एक कमकुवत बाजू आहे आणि त्याची टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये जागा होत नाही. शोएब अख्तरच्या मते विकेटकीपर संजू सॅमसन टीम इंडियाची पडकी बाजू आहे. पण संजू सॅमसन प्रत्येक सामन्यात टीम इंडियाचा भाग राहिला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याला वर फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
आशिया कप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी संजू सॅमसन टीम इंडियासाठी ओपन करत होता. पण शुबमन गिलची एन्ट्री झाली आणि त्याची जागा गेली. पण संजू सॅमसन हा प्लेइंग 11 चा भाग आहे. त्यामुळे त्याला त्याच्या पोझिशनसाठी मन मारावं लागत आहे. तसेच मधल्या फळीत फलंदाजी करण्याशिवाय पर्याय नाही. संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली तेव्हा फार काही खास केलं नाही. त्यामुळे शोएब अख्तर त्याला पडकी बाजू असं म्हणत आहे. पण संजू सॅमसन रंगात आला तर त्याला कोणत्या पोझिशनची गरज नाही हे देखील तितकंच खरं आहे.
शोएब अख्तरने पाकिस्तानच्या टीव्ही कार्यक्रमात सांगितलं की, ‘विचार करा केएल राहुल या संघात नाही. संजू सॅमसनच्या जागी केएल राहुलला घ्यायला हवं होतं. तो देखील मोठे फटके मारतो आणि योग्य ठिकाणी खेळतो. यासाठी संजू सॅमसन या संघाची कमकुवत बाजू आहे. यासाठी भारत पाकिस्तान सामना 19 व्या षटकापर्यंत पोहोचला. नाही तर इतक्या लांब हा सामना गेला नसता.’ संजू सॅमसनची बॅट सुपर फेरीत फार काही चालली नाही. धावांचा पाठलाग करताना 17 चेंडूत 13 धावा करून बाद झाला होता. ओमानविरुद्धही साखळी फेरीत 45 चेंडूत 56 धावा कल्या होत्या.