महाराष्ट्रात पुन्हा मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? आधी दुचाकी, नंतर जळालेल्या अस्थी… माजी सरपंचासोबत नेमकं काय घडलं?
कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर २ महिन्यांपासून बेपत्ता असून जंगलात जळालेल्या अस्थी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी आज कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर (५२) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी ते रात्री जेवणासाठी बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर पिळणकर अद्याप घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास संथ गतीने होत असल्याचा आरोपही कुटुंबाकडून केला जात आहे. आज याप्रकरणी कोल्हापूरच्या दसरा चौकात संविधान हक्क संघर्ष समिती आणि पिळणकर कुटुंबियांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
नेमकी घटना काय?
महेश पिळणकर हे ७ जानेवारीला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. यावेळी तपासादरम्यान पाटगावलगत असलेल्या कुलकर्णी नावाच्या शेताजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. धक्कादायक बाब म्हणजे दुचाकी सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर जंगलात जळालेल्या अवस्थेत काही अस्थी (हाडांचे अवशेष) सापडले होते. यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले होते. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले आणि भुदरगड पोलिस निरीक्षक गोरक्ष चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून जळालेले अवशेष जप्त करून ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (Forensic Lab) तपासणीसाठी पाठवले आहेत. हे अवशेष मानवी आहेत की प्राण्यांचे, याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे तपासाची दिशा स्पष्ट झालेली नाही.
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून १०० हून अधिक जणांची चौकशी केली आहे. महेश पिळणकर हे नक्की कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक वैमनस्यातून त्यांच्यासोबत काही गैरप्रकार घडला आहे का, यादृष्टीने तपास सुरू आहे. पिळणकर हे व्यवसायाने काजू उत्पादक आणि हर्बल व्यापारी असल्याने त्या क्षेत्रातील वादाचीही पडताळणी केली जात आहे. आज झालेल्या आंदोलनात महेश पिळणकर यांच्या पत्नी आणि कुटुंबयांनी “महेश पिळणकर यांचं झालं तरी काय?” असा सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
दरम्यान या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. संतोष देशमुख यांचेही अशाच प्रकारे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला होता. पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या बाबतीतही गाडी एका ठिकाणी आणि काही अंतरावर जळालेल्या अस्थी सापडल्याने, कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती तर झाली नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
