IND vs SL: अंपायर्सच्या चुकीमुळे इंडिया-श्रीलंका पहिल्या वनडेत सुपर ओव्हर नाही!

ODI Super Over Rule: श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सलामीचा सामना बरोबरीत सुटला होता. मात्र सुपर ओव्हर झाली नाही.

IND vs SL: अंपायर्सच्या चुकीमुळे इंडिया-श्रीलंका पहिल्या वनडेत सुपर ओव्हर नाही!
super over
| Updated on: Aug 15, 2024 | 3:55 PM

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा काही दिवसांआधी पूर्ण झाला. टीम इंडियाने दौऱ्यातील टी 20 मालिका 3-0 फरकाने जिंकली. तर एकदिवसीय मालिकेत 2-0 ने गमवावी लागली. श्रीलंकेने दुसरा आणि तिसरा सामना सलग जिंकत मालिका खिशात घातली. श्रीलंकेला टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय द्विपक्षीय मालिका 27 वर्षांनी जिंकण्यात यश आलं. मात्र या मालिकेतील पहिला सामना हा बरोबरीत सुटला होता अर्थात टाय झाला होता. साधारणपणे सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरद्वारे विजयी संघ निश्चित केला जातो.मात्र या सामन्यात सुपर ओव्हर न झाल्याने क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

ईसपीएन क्रिकेइंफोनुसार, सामनाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली नाही. आयसीसीच्या खेळांच्या अटीनुसार, उभयसंघातील पहिल्या वनडेतील संबधित सामनाधिकाऱ्यांनी (मॅच रेफरी) सुपर ओव्हर न खेळवण्याची चूक केली. ईएसपीएन क्रिकइंफोला मिळालेल्या माहितीनुसार, या सामन्यात जोएल विल्सन आणि रवींद्र विमलसिरी हे फिल्ड अंपायर होते. पॉल रॉफेल टीव्ही तर रुचिरा पल्लियागुरुगे या फोर्थ अंपायर होत्या. तर रंजन मदुगले मॅच रेफरी होते. या पंचांनी आणि मॅच रेफरीने त्यांच्याकडू चूक झाल्याचं मान्य केलं आहे. आमच्याकडून एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या नियमांचं चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला. आयसीसीच्या नियमांनुसार, सामना बरोबरीत सुटल्यानंतर निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्याची तरतूद आहे.

उभयसंघातील सामना बरोबरीत सुटल्यानंतर पंचांनी स्टंपवरील बेल्स हटवल्या. त्यामुळे सुपर ओव्हर होणार नसल्याचं निश्चित झालं. मात्र दोन्ही संघाकडून कुणीही सुपर ओव्हरबाबत विचारणा केली नाही.खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. मात्र त्यानंतर सुपर ओव्हर का झाली नाही? याबाबत सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली.

आयसीसीचे नियम काय सांगतात?

आयसीसीने डिसेंबर 2023 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आणलेल्या नियमांनुसार, सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर होणार. तसेच सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यास तोवर सुपर ओव्हर होणार जोवर कोणती टीम विजयी होत नाही. तसेच विजेता संघ निश्चित करण्यासारखी परिस्थिती नसेल, अशा वेळेस सामना बरोबरीत राहिल. मात्र पंचांनी आणि सामनाधिकाऱ्यांनी सामना टाय झाल्यानंतर कोणतीच चर्चा केली नाही. मात्र त्यानंतर उर्वरित 2 पैकी 1 सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवण्याची तयारी या पंचांनी आणि सामन्याधिकाऱ्यांनी दर्शवली.

सामन्यात काय झालं?

श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाला विजयी धावा पूर्ण करण्यासाठी 18 बॉलमध्ये 5 धावांची गरज होती आणि हातात 2 विकेट्स होत्या. मात्र टीम इंडियाने 48 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us