IND vs PAK : सूर्यकुमार यादव नाणेफेकीनंतर आपल्या भूमिकेवर ठाम, आयसीसी स्पर्धेतही पाकिस्तानला दणका
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 27 व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीनंतर काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. सूर्यकुमार यादव हँडशेक करणार की नाही वगैरे.. या सामन्यातही सूर्यकुमारने आपली भूमिका बदलली नाही. तसेच हँडशेक झालंच नाही.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. भारत पाकिस्तान संघ अखेर भिडणार आहेत. या सामन्यातील विजेत्या संघाला सुपर 8 फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. नाणेफेकीचा कौल झाला आणि पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर हातमिळवणी होईल की नाही याकडे लक्ष लागून होतं. पण नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर कर्णधार सलमना आगा निघून गेला. त्यामुळे हातमिळवणीचा प्रश्नच उरला नाही.
असं असताना भारताने आशिया कप स्पर्धेनंतर नो हँडशेक पॉलिसीचा कित्ता या सामन्यातही कायम ठेवला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान कर्णधार सलमान आगासोबत हँडशेक करण्याचं टाळलं. खरं तर टाळण्यापेक्षा नकार दिला असंच म्हणावं लागेल. कारण गेल्या काही महिन्यांपासून असचं सुरू आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही असंच चित्र पाहायला मिळालं. आशिया कप स्पर्धेच्या तिन्ही सामन्यात सूर्यकुमार यादवने हात मिळवला नव्हता. त्यामुळे बराच वाद झाला होता. पाकिस्तानने अपमान झाल्याप्रकरणी सामनाधिकारी पायक्राफ्ट यांना जबाबदार धरलं होतं. तसेच स्पर्धेतून हकालपट्टी केल्यानंतर स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवली होती.
भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा हँडशेक करण्यास नकार दिल्याने पाकिस्तान संघ पुढे काय पाऊल उचलणार? याची उत्सुकता आहे. कारण आता ही आयसीसी स्पर्धा आहे. तसेच हे प्रकरणी आयसीसीच्या कोर्टात जाईल. त्यामुळे आयसीसीला या प्रकरणी काही नाही काही तर कारवाई करणं भाग होईल. भारताच्या नो हँडशेक पॉलिसीवर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
This ‘no shaking hands’ is such a silly thing that India has started. It’s unbecoming of a nation like ours. Either play properly within the spirit of the game or don’t play at all.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) February 15, 2026
पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर युद्धजन्य स्थिती निवळली. पण संबंध अजूनही तणावपूर्णच आहेत.