T20 World Cup : 19 वर्षांचा रेकॉर्ड तोडला, झिंबाब्वेच्या संघाला धू धू धुतलं, भारताची वादळी फटकेबाजी

टी20 वर्ल्ड कपमध्ये सध्या सुपर 8 फेरीमधली सामने सुरू आहेत. भारतानं आज झिंबाब्वेविरोधात तुफान फटकेबाजी केली आहे. झिंबाव्बेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर मैदानात तुफान आल्याचं पहायला मिळालं.

T20 World Cup : 19 वर्षांचा रेकॉर्ड तोडला, झिंबाब्वेच्या संघाला धू धू धुतलं, भारताची वादळी फटकेबाजी
India vs Zimbabwe
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 9:18 PM

टी 20 वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. पहिल्या फेरीमध्ये भारतानं आपले सर्व सामने जिंकले होते.  मात्र सुपर 8 च्या फेरीमध्ये पहिल्याच सामन्यात भारताचा मोठा पराभव झाला, दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभवाचा दणका दिला, दरम्यान या पराभवामुळे भारत आता उपांत्य फेरीमध्ये पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. उपांत्य फेरीतील समीकरण हे खूपच गुंतागुंतीचं झालं होतं. मात्र गुरुवारी भारतासाठी दोन गुड न्यूज आल्या. एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजीचा पराभव केला. वेस्ट इंडीजच्या पराभवामुळे उपात्य फेरीत पोहोचण्याचा भारताचा मार्ग सोपा झाला. दरम्यान या सामन्यानंतर आज दुसरा सामना आणि टी20 वर्ल्ड कपमधील 48 वा सामना भारत आणि झिंबाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यामध्ये सुरू आहे.

झिंबाब्वेने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचं पहायला मिळालं, भारतानं झिंबाब्वेची गोलंदाजी फोडून काढली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना झिंबाब्वेला विजयासाठी तब्बल 257 धावांंचं आव्हान दिलं आहे. याचसोबत भारतानं 19 वर्ष जुना आपलाच रेकॉर्ड तोडला आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारताची सर्वोच्च धावसंख्या ही 220 एवढी होती, परंतु भारतानं हा आपला रेकॉर्ड मोडला असून, झिंबाब्वे विरोधात 256 धावा फटकावल्या आहेत. गेल्या काही सामन्यात अभिषेक शर्माला चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र या सामन्यात त्याने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्याने 30 बॉलमध्ये 4 फोर आणि 4  सिक्स मारले. अभिषेक शर्मासोबतच हार्दिक पांड्याने देखील 50 धावा केल्या.  तिलक वर्माने 44 धावा फटकावल्या त्याने 16 बॉलमध्ये 3 चौके आणि 4 सिक्स मारले.  दरम्यान अजून झिंबाब्वेची इनिंग  बाकी आहे.

या सामन्यानंतर आता भारताचा सामना सुपर 8 मध्ये वेस्ट इंडीजसोबत होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघासाठी करा किंवा मराची स्थिती असणार आहे. जो संघ जिंकेल तो थेट उपांत्य फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे आता भारताच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरोधात आज पराभव झाल्यामुळे पुढचा सामना जिंकण्याच वेस्ट इंडीजचा प्रयत्न असेल.

Follow Us