
टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर फिनिशर रिंकु सिंह त्याच्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाला. रिंकूने सोशल मीडियावर त्याचे वडील खानचंद्र सिंह यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट लिहीली आहे. रिंकूने या पोस्टमध्ये वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रिंकूने या पोस्टमध्ये तुमची कायम आठवण येईल, असं म्हटलंय. खानचंद्र सिंह याचं 27 फेब्रुवारी रोजी गंभीर आजारामुळे निधन झालं होतं. त्यामुळे रिंकूला वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान टीम इंडियाची साथ सोडून घरी परतावं लागलं होतं. मात्र रिंकु सर्व सोपस्कार पार पाडून पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मदतीसाठी परतला होता. त्यानंतर भारताने उर्वरित सामने जिंकून वर्ल्ड कपवर मोहर उमटवली. त्यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी परतले. रिंकूने त्यानंतर आपल्या वडिलांच्या आठवणीत ही पोस्ट लिहीलीय.
रिंकूने लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्याच्या वडिलांनी त्याला दिलेल्या शिकवणीचा उल्लेख केलाय. तसेच वडिलांशिवाय आता प्रत्येक क्षणी कसोटी असेल हे रिंकूने या पोस्टमध्ये नमूद केलंय. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर निर्णय घेताना वडिलांचा तसेच कुटुंबियांचा घरचा सल्ला अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र आता आपल्यासोबत आपले वडील नाहीत, ही खंत रिंकूने पोस्टमधून व्यक्त केलीय. तसेच वर्ल्ड कप जिंकण्याचा तुमचं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही माझ्या जवळ असतात तर फार बरं झालं असतं, अशा शब्दात रिंकूने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय.
खानचंद्र सिंह यांनी घरोघरी जाऊन दारोदारी 14 आणि 19 किलोचे सिलेंडर पोहचवत घरखर्च चालवला. इतकंच नाही तर रिंकूला क्रिकेटपटू होण्यासाठी काय हवंय आणि काय नको याची काळजी घेतली. रिंकूनेही आई-वडिलांच्या संघर्षाची जाणीव ठेवत मेहनत घेतली. रिंकूच्या मेहनतीचं चीजही झालं. रिंकूने देशासाठी वर्ल्ड कप जिंकून वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. मात्र कुटुंबासाठी खस्ता खाणारा हा बापमाणूस आपल्यात आता नाहीय, ही भावना रिंकूसाठी मन हेलावणारी आहे.
रिंकूने पोस्टमध्ये काय म्हटंलय?
“तुमच्याशी बोलल्याशिवाय एकही दिवस गेलेला नाही. तुमच्याशिवाय पुढील आयुष्यात कसं होईल हे मला माहित नाही. मला पावलोपावली तुमची गरज लागेल”, असं रिंकूने या पोस्टमध्ये म्हटलंय.
“कर्तव्य सर्वात आधी असल्याचं तुम्ही शिकवण दिली होती. त्यामुळे फिल्डवर (क्रिकेटच्या मैदानात) तुमचं स्वप्न (वर्ल्ड कप जिंकण्याचं) पूर्ण करत होतो. तुमचं स्वप्न पूर्ण झालंय. त्यामुळे आता तुम्ही माझ्या जवळ पाहिजे होतात असं वाटतंय”, असं म्हणत रिंकूने वडिलांना उद्देशून त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय मात्र तुम्ही सोबत नाहीत, ही खंत व्यक्त केलीय.
“प्रत्येक छोट्या-मोठ्या आनंदाच्या क्षणी तुमची उणीव जाणवेल. तुमची फार आठवण येईल बाबा.. खूप जास्त”असं म्हणत रिंकूने जड अंतकरणाने आपल्या पोस्टचा शेवट केला आहे.