Icc Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोठा निर्णय, रोहितसेनेचा प्लान काय?

Indian Cricket Team : टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेआधी दुबईत सराव सामना खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Icc Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोठा निर्णय, रोहितसेनेचा प्लान काय?
mohammed siraj and rohit sharma
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 10, 2025 | 7:06 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार स्पर्धेसाठी लगबग सुरु आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी इंग्लंडने स्पर्धेसाठी संघ जाहीर करत आघाडी घेतली आहे. तर इतर 7 संघानी अद्याप खेळाडूंची नावं जाहीर केलेली नाहीत. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडिया या स्पर्धेतील सर्व सामने सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत खेळणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेआधी इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. मात्र या मालिकेआधी टीम इंडिया दुबईत आणखी एक सामना खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडियासाठी हा सराव सामना आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दुबईत पोहचल्यानंतर सराव सामना खेळणार आहे. टीम इंडिया कुणाविरुद्ध सराव सामना खेळणार? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळू शकलेलं नाही. तसेच हा सराव सामना आयसीसीकडून आयोजित करण्यात येणार आहे? की टीम इंडियाचा सराव व्हावा, या उद्देशाने बीसीसीआय प्रॅक्टीस मॅचचं आयोजन करणार आहे? याबाबतही स्पष्टता नाही.

एकदिवसीय मालिका आणि रंगीत तालीम

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीआधी एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना हा 9 फेब्रुवारीला खेळवण्यात येईल. तर 15 फेब्रुवारीला अंतिम सामना पार पडेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुबईत टेस्ट!

चॅम्पियन्स ट्रॉफी

दरम्यान टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील मोहिमेची सुरुवात 20 फेब्रुवारीपासून करणार आहे. टीम इंडिया शेजारी बांगलादेशविरुद्ध 2 हात करणार आहे. तर टीम इंडियाच्या दुसर्‍या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. तर साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे.