IND vs SA : गुवाहाटीत पराभूत झाल्यास टीम इंडियाचा WTC फायनलमधून पत्ता कट? जाणून घ्या समीकरण

WTC 2025-2027 Points Table : टीम इंडिया आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 3 पैकी 2 वेळा अंतिम फेरीत पोहचली आहे. या स्पर्धेच्या चौथ्या साखळीत टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचेल का? जाणून घ्या समीकरण.

IND vs SA : गुवाहाटीत पराभूत झाल्यास टीम इंडियाचा WTC फायनलमधून पत्ता कट? जाणून घ्या समीकरण
Team India Wtc Scenario Final 2025 2027
Image Credit source: Bcci
| Updated on: Nov 24, 2025 | 11:28 PM

भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशीच पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटी सामन्यातही पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या. त्यानंतर भारताला 201 रन्सवर ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 288 धावांची आघाडी घेतली. तर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवली. आता भारताला मालिका पराभव टाळायचा असेल तर कोणत्याही स्थितीत सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे मालिका आणि सामन्याच्या दृष्टीने चौथा सामना निर्णायक ठरणार आहे. मात्र हा सामना गमावला तर भारताला मायेदशात न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमवावी लागेल. तसेच गुवाहाटीतील पराभवानंतर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मोहिमेवर काय परिणाम पडेल? हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया चौथ्या स्थानी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने या साखळीतील सर्व सामने जिंकले आहेत. डब्ल्यूटीसी स्पर्धेत विजयी गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर रँकिंग ठरते. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 100 टक्के गुण आहेत. तर गतविजेता दक्षिण आफ्रिकेची विजयी टक्केवारी 66.67 अशी आहे. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. तर श्रीलंका तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 66.68 अशी आहे. तर टीम इंडिया चौथ्या स्थानी आहे. भारताची टक्केवारी ही 54.17 इतकी आहे. तसेच पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानी आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विजय पाकिस्तानसाठी फायदेशीर

गुवाहाटीत पराभव झाल्यास भारताच्या विजयी टक्केवारीवर परिणाम होईल. भारताच्या पराभवामुळे विजयी टक्केवारी 48.14 इतकी होईल. त्याचा फायदा थेट पाकिस्तानला होईल. पाकिस्तान 50 पॉइंट्ससह पाचव्या स्थानी आहे. तसेच भारताची या पराभवानंतर पाचव्या स्थानी घसरण होईल. तर पाकिस्तान आपोआप चौथ्या स्थानी पोहचेल. तर दक्षिण आफ्रिकेचं दुसरं स्थान आणखी भक्कम होईल.  गुवाहाटीतील विजयांनतर दक्षिण आफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 75 इतकी होईल.

भारताच्या WTC फायनल मोहिमेला धक्का?

भारताचा गुवाहाटी इथे पराभव झाल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मोहिमेतून पत्ता कट होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. टीम इंडियाला या साखळीत गुवाहाटीतनंतर एकूण 9 सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया 2 मालिका या विदेशात खेळणार आहे. भारताने 9 पैकी 8 सामने जिंकल्यास टक्केवारी 70 इतकी होईल. या स्पर्धेच्या इतिहासात गेल्या 3 वेळा अंतिम फेरीत पोहचणाऱ्या संघाची विजयी टक्केवारी ही 64-68 इतकी होती. त्यामुळे भारतीय संघाने 8 सामने जिंकल्यास अंतिम फेरीचं तिकीट सहज मिळेल.

Follow Us