
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. पण यासाठीचं वेळापत्रक अद्यापही जाहीर केलेलं नाही. असं असताना या स्पर्धेत एक बदल होण्याची दाट शक्यता वाढली आहे. हा बदल म्हणजे या स्पर्धेतील सामन्यांची संख्या वाढू शकते. बीसीसीआय आयपीएल 2026 स्पर्धेत आणखी 10 सामन्यांचं आयोजन करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या स्पर्धेत प्रत्येक संघ साखळी फेरीत 14 सामने खेळत होता. त्यामुळे या पर्वापासून प्रत्येक फ्रेंचायझीला 16 सामने खेळावे लागू शकतात. आयपीएल स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेतात. बीसीसीआयने यापूर्वी आयपीएल सामन्यांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा केली होती. 2025 आणि 2026 या पर्वात आयपीएल सामन्यांची संख्या 74 वरून 84 करण्याचा प्रस्ताव होता. पण मागच्या पर्वात तसं काही शक्य झालं नाही. सामन्यांमध्ये वाढ झाल्यास विदेशी खेळाडू अनुपलब्ध राहण्याची शक्यता होती.त्यामुळे मागच्या पर्वात बीसीसीआयने 74 सामने खेळवले.
बीसीसीआयने यंदाच्या पर्वात 84 सामने खेळवण्यास हिरवा कंदील दाखवल्याचं वृत्त द फायनान्शियर एक्स्प्रेसने दिलं आहे. त्यामुळे गेल्या पर्वाच्या तुलनेच यंदा 10 सामने अतिरिक्त होतील असं सांगितलं जात आहे. इतकंच काय तर 2027 आयपीएल स्पर्धेत ही संख्या आणखी 10 सामन्यांनी वाढेल. म्हणजेच पुढच्या पर्वात 94 सामने होण्याची शक्यता आहे. म्हणजेच प्रत्येक संघ 18 सामने खेळेल. नऊ सामने होम ग्राउंडवर होतील, तर उर्वरित नऊ सामने अवे ग्राउंडवर होतील. म्हणजेच, आयपीएल सीझन 19 मध्ये प्रेक्षकांना 84 सामने पाहण्याची संधी मिळेल. तसेच पुढील वर्षी म्हणजेच 2027 पासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये 94 सामने पाहण्याची संधी जवळजवळ निश्चित आहे.
आयपीएल मिडिया हक्क करारानुसार, बीसीसीआयने 18व्या आणि 19व्या पर्वात 84 सामने होतील असं सांगितलं होतं. पण मागच्या पर्वात तसं झालं नाही. मात्र यंदाच्या पर्वात आयपीएल प्रसारकांनी पुन्हा एकदा सामन्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, पुढच्या पर्वात 12 संघ खेळवले जातील अशीही चर्चा आहे. पण या निव्वळ सोशल मीडियावरील चर्चा आहे. सहा-सहा संघाचे दोन गट पाडून उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामने खेळवले जातील, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पण या चर्चांना तसा काही अर्थ नाही.