IPL 2026: वैभव सूर्यवंशी जाणीवपूर्वक करतोय दिग्गज गोलंदाजांना लक्ष्य! असं कारण तर नाही ना?
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहायला मिळाला. यावेळी त्याने दिग्गज गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या या रणनीतीचं कौतुक होत आहे.

आयपीएल स्पर्धेतील 16 सामन्याचा खेळ संपला असून वैभव सूर्यवंशीच्या खेळीची चर्चा रंगली आहे. कारण त्याने आक्रमक खेळी करत सर्वच संघातील दिग्गज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार, मॅट हेनरीसारख्या दिग्गज गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. आतापर्यंत या गोलंदाजांनी विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रूट, केन विल्यमसन आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंना अडचणीत आणलं. पण वैभव सूर्यवंशीने वयाच्या 15व्या वर्षी या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण समोर दिग्गज गोलंदाज असताना त्याच्या फलंदाजीत काहीच फरक पडलेला नाही. उलट दिग्गज गोलंदाजांविरुद्ध अजून आक्रमकपणे खेळतो. वैभव सूर्यवंशी जाणीवपूर्वक दिग्गज गोलंदाजांना लक्ष्य करतो का? असा प्रश्न पडतो.
आयपीएल स्पर्धेत 2024 मध्ये वैभव सूर्यवंशीने पदार्पण केलं होतं. यावेळी त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतरच्या सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता दुसऱ्या पर्वातही त्याचा आक्रमक बाणा सुरू आहे. या पर्वात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मॅट हेनरीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला.मुंबई इंडियन्सविरुद्ध ट्रेंट बोल्टला लक्ष्य करत पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. इतकंच काय तर बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आरसीबीविरुद्ध भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारले.
Does Vaibhav suryavanshi targets big bowlers purposely?
I like to think so.
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 10, 2026
वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा पाहून माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने एक प्रश्न विचारला आहे. तसेच त्याचं उत्तरही दिलं आहे. इरफानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले, “वैभव सूर्यवंशी मुद्दाम मोठ्या गोलंदाजांना लक्ष्य करतो का? मला तसा विचार करायला आवडेल.” इरफान पठाणचं म्हणणं योग्यच आहे. कारण अनेक खेळाडू अधिक बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांशी सामना करणं आवडतं. यामुळे विरोधी संघाचे मनोधैर्य पूर्णपणे खचते. ही रणनिती बुद्धिबळ किंवा युद्धनीतीसारखीच आहे. यात मंत्री किंवा सेनापतीवर सुरूवातीला प्रहार करून विरोधी संघावर दबाव आणला जातो. यामुळे सामना किंवा युद्ध जिंकणे सोपे होते.