वैभव सूर्यवंशीचं काय? इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी श्रेयस अय्यरची या खेळाडूंना पसंती, म्हणाला..

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळाली? जाणून घ्या.

वैभव सूर्यवंशीचं काय? इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी श्रेयस अय्यरची या खेळाडूंना पसंती, म्हणाला..
वैभव सूर्यवंशीचं काय? इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी श्रेयस अय्यरची या खेळाडूंना पसंती, म्हणाला..
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 01, 2026 | 9:55 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यतील पहिला टी20 सामना चेस्टर-ले-स्ट्रीटच्या रिव्हरसाइड ग्राउंडवर होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजी स्वीकारली. श्रेयस नाणेफेक जिंकला इथपर्यंत ठीक होतं, पण प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशीला संधी दिली का? याबाबत उत्सुकता होती. कारण आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याला बेंचवरच बसवलं होतं. ही मालिका 2-0 ने गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना होता. पण तसं अजिबात झालं नाही. टीम इंडियाची प्लेइंग 11 जाहीर होताच क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला. कारण प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशीचं नाव नव्हतं. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. खरं तर श्रेयस अय्यरने याचे संकेत सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले होते. आता वैभवला कोणत्या सामन्यात संधी मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्लेइंग 11 बाबत श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहोत, ज्यात अक्षर एक अष्टपैलू खेळाडू आहे, आणि दोन वेगवान गोलंदाज असतील.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आयर्लंडविरुद्धची मालिका आता इतिहासजमा झाली आहे. ही एक नवीन मालिका आहे, पाच सामने आहेत, आणि सर्व काही पणाला लागले आहे. निश्चितच, ही आमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कर्णधार म्हणून ही माझी पहिली, खरं तर दुसरीच मालिका आहे. त्यामुळे, मी खूप उत्साहित आहे. आम्हाला जे हवं होतं ते मिळालं आहे. काल आम्ही इथे सराव केला, आणि इथल्या वातावरणाशी बऱ्यापैकी जुळवून घेतलं आहे. त्यामुळे, एका रोमांचक सामन्याची आम्ही वाट पाहत आहोत.’

आयर्लंड मालिकेनंतर ड्रेसिंग रूममधील वातावरण कसं आहे? यावर श्रेयस म्हणाला की, वातावरण अगदी ठीक आहे. खरं सांगायचं तर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे, आयर्लंडविरुद्धची मालिका आता इतिहासजमा झाली आहे. त्या मालिकेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे. आणि इथे आल्यावर, इंग्लंडचा संघ कसा क्रिकेट खेळत आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे, आम्ही निश्चितच थोडे उत्साही आहोत, आम्हाला त्यांची बलस्थाने आणि कमकुवतपणा माहीत आहे, आणि एका शानदार सामन्याची आम्ही वाट पाहत आहोत. खेळपट्टीवर बऱ्यापैकी गवत आहे. आम्ही कालही त्याच खेळपट्टीवर सराव केला. त्यामुळे, खेळपट्टी कशी खेळेल याचा अंदाज लावता येत नाही, पण निश्चितपणे इरादा उंचावलेला असेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद, ल्यूक वूड.

Follow Us