MAH vs PUN : महाराष्ट्राची सेमी फायनलमध्ये धडक, पंजाबचा 70 धावांनी धुव्वा, अर्शदीपची कामगिरी व्यर्थ

Maharashtra vs Punjab Quarter Final 3 Match Result : महाराष्ट्र क्रिकेट संघाने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात पंजाबचा 70 धावांनी धुव्वा उडवत विजय हजारे ट्रॉफीतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

MAH vs PUN : महाराष्ट्राची सेमी फायनलमध्ये धडक, पंजाबचा 70 धावांनी धुव्वा, अर्शदीपची कामगिरी व्यर्थ
ruturaj gaikwad and arshdeep singh mah vs pun vht
Image Credit source: Bcci Domestic X Acccount
| Updated on: Jan 11, 2025 | 5:55 PM

कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात महाराष्ट्र क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2024-2025 या हंगामाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महाराष्ट्र टीमने तिसऱ्या उपांत्य पूर्व सामन्यात पंजाबवर 70 धावांनी मात केली. बडोद्यातील कोतंबी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात महाराष्ट्रने पंजाबला विजयासाठी 276 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र महाराष्ट्रच्या गोलंदाजांसमोर पंजाबचा डाव हा 44.4 ओव्हरमध्ये 205 धावांवर आटोपला. महाराष्ट्रने या विजयासह सेमी फायनलमध्ये धडक मारली. पंजाबच्या पराभवामुळे अर्शदीप सिंह याची अष्टपैलू कामगिरी वाया गेली.

पंजाबची बॅटिंग

पंजाबसाठी अर्शदीने याने बॉलिंगनंतर बॅटिंगनेही धमाका केला. अर्शदीपने पंजाबच्या इतर फलंदाजांना लाजवेल अशी खेळी केली. अर्शदीपने पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या. अर्शदीपने 39 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 49 रन्स केल्या. अर्शदीपचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. अर्शदीप व्यतिरिक्त अनमोलप्रीत सिंह याने 77 बॉलमध्ये 48 रन्स केल्या. तर सनवीर सिंह याने 24 धावांचं योगदान दिलं. या तिघांव्यतिरिक्त इतर कुणालाही 20 पार मजल मारता आली नाही. महाराष्ट्रकडून मुकेश चौधरी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रदीप दधे याने दोघांना बाद केलं. तर चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

महाराष्ट्राची बॅटिंग

दरम्यान त्याआधी पंजाबने टॉस जिंकून महाराष्ट्राला बॅटिंगसाठी भाग पाडलं. महाराष्ट्रसाठी अर्शीन कुलकर्णी याने सर्वाधिक धावा केल्या. तर अंकीत बावणे आणि निखील नाईक या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. अर्शीनने 14 चौकारांसह 137 चेंडूत 107 धावा केल्या. अंकित बावणे याने 7 चौकारांसह 85 चेंडूत 60 धावा जोडल्या. तर अखेरीस निखील नाईक याने 29 बॉलमध्ये नॉट आऊट 52 रन्स केल्या. तर सत्यजीत बच्छाव याने 20 धावांचं योगदान दिलं. राहुल त्रिपाठीने 15 धावा जोडल्या. सिद्धेश वीर याला भोपळाही फोडता आला नाही. तर कॅप्टन ऋतुराज याने निराशा केली. ऋतुराज 5 धावांवर बाद झाला. पंजाबसाठी अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नमन धीर याने दोघांना बाद केलं. तर कॅप्टन अभिषेक शर्मा याने 1 विकेट मिळवली.

महाराष्ट्रची उपांत्य फेरीत धडक

महाराष्ट्र प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, अझीम काझी, निखिल नाईक (विकेटकीपर), सत्यजीत बच्छाव, रजनीश गुरबानी, मुकेश चौधरी आणि प्रदीप दधे.

पंजाब प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग, नेहल वढेरा, नमन धीर, अनमोल मल्होत्रा ​​(विकेटकीपर), रमनदीप सिंग, सनवीर सिंग, बलतेज सिंग, अर्शदीप सिंग आणि रघु शर्मा.