मोठी बातमी! VSR कंपनीची अनेक विमानं सदोष?; पायलट, कर्मचाऱ्यांनाही अपघाताची भीती, काय घडलं त्या वादळी बैठकीत? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Rohit Pawar on VSR Company: अजितदादांच्या विमान अपघाताचे दु:ख उभा महाराष्ट्र अद्याप विसरलेला नाही. आमदार रोहित पवार हे सातत्याने व्हीएसआरच नाही तर देशातील विमान वाहतूक सुरक्षित करण्यासाठी आवाज उठवत आहेत. आता व्हीएसआर कंपनीच्या बैठकीतच कर्मचाऱ्यांनी कंपनीला घरचा आहेर दिला आहे. काय घडलं त्या वादळी बैठकीत?

Rohit Pawar on VSR Company: अजितदादांच्या बारामती येथील विमान अपघाताने उभा महाराष्ट्र हादरला. एका उमद्या नेत्याला गमावल्याची भावना सर्वांनीच व्यक्त केली. व्हीएसआर कंपनी आणि तिचे मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोधात आमदार रोहित पवार यांनी मोर्चा उघडला आहे. या कंपनीची विमानं सदोष आहेत. पण काही बड्या राजकीय शक्ती व्ही. के. सिंग आणि कंपनीला वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचा वरदहस्त असल्याचाही आरोप केला आहे. दरम्यान व्हीएसआर कंपनीची नुकतीच झालेली बैठक वादळी ठरली आहे. कंपनीची विमानं सदोष असल्याचा आरोप दस्तूरखुद्द कर्मचारी आणि पायलटनं केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याविषयीचा खुलासा आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे.
पायलट, कर्मचाऱ्यांचा घरचा आहेर
“अजितदादांच्या विमान अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची बहुतांश विमाने सदोष असून उड्डाणासाठी अत्यंत धोकादायक असल्याने आता कंपनीचे पायलट आणि क्रू मेंबर यांना देखील अपघाताची भीती वाटतेय. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या कंपनीच्या बैठकीत पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदोष विमानात बसण्याची भीती बोलून दाखवली, परंतु सरकारमधील काही लोकांचा वरदहस्त असल्याने ‘सरकार आपल्या पाठीशी आहे, घाबरू नका’ असा शाब्दिक धीर त्यांना देण्यात आला. पण दुर्दैवाने अपघात झाला तर व्यवस्थापनाने त्यांना दिलेल्या या शाब्दिक धीराने त्यांचा जीव वाचणार आहे का, असा प्रश्न पडतो.” असे ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना या ट्वीटद्वारे समोर आणल्या आहेत.
अजितदादांच्या विमान अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची बहुतांश विमाने सदोष असून उड्डाणासाठी अत्यंत धोकादायक असल्याने आता कंपनीचे पायलट आणि क्रू मेंबर यांना देखील अपघाताची भीती वाटतेय. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या कंपनीच्या बैठकीत पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदोष विमानात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 18, 2026
राज्य सरकारची व्हीएसआरवर मेहेरबानी
आता कंपनीचे कर्मचारीच व्हीएसआरची विमानं सदोष असल्याचा दावा करत असताना कंपनीवर योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सदोष विमानं असताना सरकारची कंपनीवर इतकी मेहरबानी का असा सवाल त्यांनी ट्वीटद्वारे विचारला आहे.
“एकीकडं अजितदादांच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारने VSR कंपनीची अनेक विमानं सदोष केली, दुसरीकडे नियम आणि कायद्यांना पायदळी तुडवूनही VSR कंपनीवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळंच या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला कुणाचीही भीती राहिली नसून दिवसेंदिवस त्याची गुर्मी वाढतच चालल्याचं दिसतंय..! तो सरकारपेक्षाही वरचढ झाला का? ज्यामुळं सरकार त्यावर कारवाई करायला घाबरतंय!” असे खरपूस समाचार त्यांनी घेतला आहे.
