IPL 2026: …तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग असं का म्हणाला?
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात टॉपला असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची स्थिती नाजूक आहे. आता आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळेल की नाही अशी स्थिती झाली आहे. असं असताना कर्णधार रियान परागने आपला संताप व्यक्त केला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 62व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न लांबलं आहे. इतकंच काय तर प्लेऑफमध्ये स्थान मिळेल की नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात राजस्थान रॉयल्सला काहीही करून जिंकावंच लागणार आहे. म्हणजेच राजस्थान रॉयल्सची करो या मरोची स्थिती आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने संताप व्यक्त केला आहे. रियान पराग सामन्यानंतर म्हणाला की, जर असंच खेळत राहिलो तर प्लेऑफ गाठू शकणार नाही.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर रियान पराग म्हणाला की, ‘मला वाटते की जर आपल्याला ट्रॉफी जिंकायची असेल तर आपल्याला अधिक चांगला खेळ करावा लागेल. मी खूप निराश आहे. मला वाटते की गेल्या चार-पाच सामन्यांमध्ये आम्ही जसा खेळ दाखवला आहे, त्यापेक्षा आमचा संघ खूपच चांगला आहे. मात्र, विश्रांतीनंतर परत आल्यावर, मला जाणवते की आज आम्ही जी ऊर्जा, कौशल्य आणि अंमलबजावणी दाखवली, ती पूर्वीसारखी राहिलेली नाही. जर आम्ही असाच खेळत राहिलो, तर आम्ही अव्वल चार संघांच्या शर्यतीत राहणार नाही.’
दरम्यान, 18 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज असताना, अनुभवी दासुन शनाकाच्या ऐवजी अर्धवेळ ऑफ-स्पिनर डोनोव्हन फरेराला गोलंदाजी देण्याच्या निर्णयाचे परागने समर्थन केले. क्रीजवर दोन डावखुरे फलंदाज असल्याने हा धोका पत्करणे आवश्यक होते, असं पराग म्हणाला. रियान पराग म्हणाला की, ‘हा काही जुगार नव्हता. मला माहित आहे की टीव्हीवर हे जुगारासारखं दिसतं, पण त्यावेळी क्रीजवर दोन डावखुरे फलंदाज होते. शनाकाला आणखी एक षटक टाकण्याऐवजी मी डोनोव्हान फरेराला गोलंदाजी देऊन एक संधी घेणे पसंत केले असते.’
राजस्थान रॉयल्सने 14 षटकांच्या अखेरीस 3 गडी गमावून 161 धावा केल्या होत्या आणि मजबूत स्थितीत होते. पण 26 चेंडूंमध्ये 51 धावा करणाऱ्या रायन परागच्या विकेटनंतर खालच्या फळीतील फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. संघाने शेवटच्या 7 षटकांत केवळ 41 धावा केल्या आणि 6 गडी गमावले. 220-230 धावांचे लक्ष्य ठेवेल असं वाटत असताना राजस्थान रॉयल्सचा संघ अचानक कोसळला आणि अवघ्या 193 धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला.