IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी स्थान मिळवलं आहे. पण आता या दोन संघात टॉप 2 मध्ये राहण्याची चुरस आहे. चला जाणून या दोन संघांना काय करावं लागणार ते...

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 67व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. असं असताना आता या दोन संघात गुणतालिकेतील टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची धडपड आहे. आरसीबीने आतापर्यंत 13 सामन्यात 9 सामने जिंकले आहेत. तसेच पदरात 18 गुण असून नेट रनरेट हा +1.065 आहे. यासह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने 13 सामन्यापैकी 8 सामने जिंकले असून 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादचे नेट रनरेट हा +0.350 आहे. पण या दोघांच्या मधे म्हणजेच दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. गुजरात टायटन्सने 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला असून 18 गुण आणि +0.695 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 2 मध्ये जागा पक्की करण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्याचं गणित समजून घेऊयात
आरसीबीचं गणित कसं असेल?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा टॉप 2 मधील प्रवास सोपा आहे. सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं तर 20 गुण होतील. त्यामुळे आसपास कोणीच नाही. त्यामुळे अव्वल स्थान कायम राहील. तसेच क्वॉलिफायर 1 खेळण्याची संधी मिळेल. आरसीबीने विजय मिळवला तर गुजरात टायटन्सचं दुसरं स्थानही कायम राहील. अशा स्थितीत आरसीबी आणि गुजरात टायटन्स हे क्वॉलिफायर 1 मध्ये खेळतील. अव्वल दोनमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी केवळ दोन संधीच मिळत नाहीत, तर एलिमिनेटरमधील थेट बाद होण्याचा दबावही टाळता येतो. दुसरीकडे, आरसीबीने हा सामना मोठ्या फरकाने गमावला तर गुजरातची तिसऱ्या स्थानावर घसरण होईल. तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर खेळेल.
सनरायझर्स हैदराबादचं गणित काय?
पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादला अव्वल स्थान गाठणं सोपं नाही. कारण नेट रन रेटमधील तफावत दूर करण्यासाठी आरसीबीला नुसतं हरवून चालणार नाही. यासाठी मोठ्या फरकाने जिंकावं लागेल. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची प्रथम फलंदाजी आली तर सामना किमान 87 धावांनी जिंकावा लागेल. जर धावांचा पाठलाग करावा लागला तर दिलेलं लक्ष्य 11 षटकात पूर्ण करावं लागेल. विशिष्ट परिस्थितीत 11.3 षटकेदेखील पुरेशी ठरू शकतात. त्यामुळे गुजरात टायटन्सचं या सामन्याकडे लक्ष असणार आहे.