IPL 2026: आरसीबीविरुद्ध सामना कुठे गमावला? पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सर्व सांगून टाकलं

आयपीएल स्पर्धेत सलग सात सामन्यात एकही पराभव न पाहिलेल्या पंजाब किंग्सची नाजूक स्थिती आहे. सलग सहा पराभवामुळे प्लेऑफचं गणित आता जर तर वर आलं आहे. पंजाब किंग्सने आरसीबीविरुद्धचा सामना 23 धावांनी गमावला. या पराभवानंतर श्रेयस अय्यरने विश्लेषण करत काय चुकलं ते सांगितलं.

IPL 2026: आरसीबीविरुद्ध सामना कुठे गमावला? पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सर्व सांगून टाकलं
IPL 2026: आरसीबीविरुद्ध सामना कुठे गमावला? पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सर्व सांगून टाकलं
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 17, 2026 | 8:17 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 61व्या सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 222 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने 20 षटकात 8 गडी गमवून 198 धावा केल्या. हा सामना पंजाब किंग्सने 23 धावांनी गमावला. खरं तर या सामन्यात पंजाब किंग्सला विजय हवा होता. पण विजय हुकल्याने प्लेऑपचं गणित लांबलं आहे. आता पंजाब किंग्ससाठी आयपीएल स्पर्धेतील शेवटचा सामना करो या मरोची लढाई असणार आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना काहीही करून जिंकावा लागेल. इतकंच काय तर इतर संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. तर आणि तरंच प्लेऑफचं गणित सुटेल. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि केकेआरच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल. दरम्यान, या पराभवानंतर श्रेयस अय्यरने विश्लेषण केलं.

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाचं विश्लेषण करत सांगितलं की, ‘त्यांनी चांगली सुरुवात केली आणि पॉवरप्लेनंतर लगेचच गोलंदाजांवर हल्ला चढवला. मला वाटतं 222 धावांपर्यंत पोहोचणे ही एक कौतुकास्पद कामगिरी होती आणि आम्हाला गोलंदाजीत फारशा विकेट्स घेता आल्या नाहीत, पण हो, मला वाटतं की सामना पॉवरप्लेमध्येच हातातून गेला. आमचे तीन गडी बाद झाले होते आणि आमच्या बहुतेक धावा प्रभसिमरन आणि प्रियांश यांनी केल्या होत्या. पॉवरप्लेमध्ये ते आम्हाला जी सुरुवात करून द्यायचे, ती आम्हाला यावेळी मिळू शकली नाही आणि त्यातच मी फलंदाजीला येऊन लवकर बाद झालो. खरंच खूप निराश झालो.’

‘शशांक आणि स्टॉयनिस तसेच मधल्या फळीतील इतर काही खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद होती. मला वाटतं आम्ही जवळपास प्रति षटक 10 धावांच्या गतीने आघाडीवर होतो, पण हो, आम्ही कमी पडलो. भुवी आणि हेझलवुड यांची गोलंदाजी जबरदस्त होती. परिणाम काहीही असो, मी नेहमी सकारात्मक असतो. त्यामुळे माझे व्यक्तिमत्व ठरत नाही आणि मी नेहमीच खंबीर वृत्तीने कामाला लागतो. मी भूतकाळात फार काळ रेंगाळणारा माणूस नाही. ते आता संपले आहे, ते होऊन गेले आहे. उद्या पुन्हा मी सूर्योदय पाहणार आहे आणि प्रत्येक संकटाच्या शेवटी आशेचा किरण असतोच.’, असं श्रेयस अय्यर म्हणाला.

Follow Us