सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार? पक्षावरील पकड सुटणार? तज्ज्ञांचे विश्लेषण काय? मोठी अपडेट समोर
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. आता त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षातील काही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सुनेत्रा पवार यांना पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे. .यात राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांचे पद जाणार? त्यांची पक्षावरील पकड कमजोर होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणावर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले विजय चोरमारे?
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटले की, ‘अजित दादा गेल्यापासून राष्ट्रवादीत आपल्याला वेगळंच राजकारण पहायला मिळत आहे, सुरवातीच्या काळात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्ष चालवत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सुनेत्रा पवार त्यांचं वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसत होतं. हे सगळं होत असताना पुन्हा दोघांमध्ये समेट होऊन पुन्हा पक्ष पुढे नेण्याची चर्चा सुरू होती. पण असं असलं तरी वरवर दिसणारं चित्र आणि आतमधील खदखद थांबली नव्हती.’
पुढे बोलताना चोरमारे यांनी सांगितले की, ‘आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आलं आहे, हे कितपत टिकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुनेत्रा पवार यांची निवड ही रितसर पक्षाची बैठक बोलावून घेतलेली होती. सगळी प्रक्रिया नियमाने पार पाडलेली होती. त्याबाबत निवडणूक आयोगाला कळवलं देखील होतं. त्यामुळे मला आता यात फार काही मोठी घडामोड होईल असं वाटत नाही. मात्र पक्षात काय चाललं आहे नीट चाललेलं नाही. किंवा नीट चाललेलं असेल तर नीट चालू द्यायचं नाही असे प्रयत्न यात दिसत आहेत. त्यामुळे याबाबत जरी नोटीस काढली असली तरी याचा फारसा परिणाम होईल असं मला वाटत नाही.’
