आरसीबीने गुजरातविरुद्धच्या सामन्यात कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवनेश्वर कुमारने केला खुलासा

आयपीएल 2026 स्पर्धेतील 42वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीला 4 गडी राखून मात दिली. या सामन्यात आरसीबीने कृणाल पांड्याला षटक टाकण्यापासून रोखलं. असं का ते सामन्यानंतर भुवनेश्वर कुमारने सांगितलं.

आरसीबीने गुजरातविरुद्धच्या सामन्यात कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवनेश्वर कुमारने केला खुलासा
आरसीबीने गुजरातविरुद्धच्या सामन्यात कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवनेश्वर कुमारने केला खुलासा
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 01, 2026 | 4:43 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आरसीबीने आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आणि त्यापैकी 6 सामन्यात विजय मिळवला. आरसीबीचा मागचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 4 विकेट राखून मात दिली. आरसीबीने 19.2 षटकात सर्व गडी गमवून 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने 15.5 षटकात 6 गडी गमावले आणि विजयी आव्हान गाठलं. या सामन्यात आरसीबीने 16 षटकं टाकली पण एकही षटक कृणाल पांड्याला दिलं नाही. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने या मागचं कारण सामन्यानंतर सांगितलं. भुवनेश्वर कुमारने सांगितलं की, कृणाल पांड्याला ठरवून गोलंदाजी दिली नाही. कारण ही खेळपट्टी फिरकीला जराही मदत करत नव्हती. त्यामुळे त्याला गोलंदाजी दिली गेली नाही.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यानंतर भुवनेश्वर कुमार सांगितलं की, ‘कृणाल पांड्याला गोलंदाजी न देणं एक रणनिती होती. तुम्ही जर सामना पाहिला तर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करत होती. त्यामुळे फिरकीपटू संघात आहेत, म्हणून त्यांनी संधी दिली पाहिजे असं करणं योग्य ठरलं नसतं. जर खेळपट्टी तशी असती तर नक्कीच त्यांना गोलंदाजी दिली असती.’ असं असताना एक प्रश्न उपस्थित होतो की, जर फिरकीला मदत मिळत नव्हती तर सुयश शर्माला गोलंदाजी का दिली? त्याने 3.5 षटकं टाकली आणि 44 धावा दिल्या. सुयश जर गोलंदीजी करू शकतो, तर कृणाला पांड्याला गोलंदाजी देण्यात काहीच अडचण नव्हती.

कृणाल पांड्याने या पर्वात चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने 9 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. त्याची इकोनॉमी रेट हा 8.8 धावा प्रति षटक आहे. कृणाल पांड्याच्या गोलंदाजी व्हेरियशन आहेत. तो अधूनमधून बाउंसर्सही टाकतो. त्यामुळे त्याला गोलंदाजी देऊन गुजरात टायटन्सला अडचणीत आणता आलं असतं. पण त्याचा वापर करता आला नाही. कर्णधार रजत पाटीदार या सामन्यातील पराभवानंतर म्हणाला की, ‘खेळपट्टीवर गवताचं चांगलं आच्छादन होतं, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत झाली. आणि जसं आम्ही म्हणालो, मला वाटतं शुबमन ज्या प्रकारे खेळला, तो पॉवरप्लेमध्ये अप्रतिम खेळला. आणि त्याने आमच्यावर दबाव टाकला, पण ज्या प्रकारे आम्ही पुनरागमन केलं आणि सामना 16व्या षटकापर्यंत ताणला, मला वाटतं ही एक सकारात्मक गोष्ट आहे.’

Follow Us