T20 WC INDW vs SAW: टीम इंडियाला अफ्रिकेने नमवलं, पराभव झाल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली..
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताला तिसऱ्या सामन्यात पराभवाची धूळ चाखावी लागली. सलग दोन विजयानंतर दक्षिण अफ्रिकेने तिसऱ्या सामन्यात 6 विकेट राखून पराभूत केलं. या पराभवानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं ते सांगितलं.

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि दक्षिण अफ्रिका संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण निकाल मात्र दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 158 धावा केल्या. तसेच विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 19.1 षटकात फक्त 4 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवामुळे टीम इंडियाचा विजयी रथ रोखला गेला आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँडला पराभूत केलं होतं. मात्र तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने मात दिली. या पराभवानंतरही भारताचं स्पर्धेतील दुसरं स्थान कायम आहे. कारण दक्षिण अफ्रिकेच्या तुलनेत भारताचा नेट रनरेट चांगला आहे. भारताचे 4 गुण असून नेट रनरेट +2.511 आहे. तर दक्षिण अफ्रिकेचेही 4 गुण असून नेट रनरेट हा -0.546 आहे.
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आम्हाला मध्येच दोन-तीन संधी मिळाल्या, पण दुर्दैवाने आम्ही त्या साधू शकलो नाही. अजून दोन सामने बाकी आहेत. सकारात्मक राहण्याची हीच वेळ आहे. श्री चरणी आणि शफाली यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी संधी निर्माण केल्या, पण इतर गोलंदाजांनी त्यांना साथ दिली नाही. या स्तरावर मिळालेल्या संधी साधायलाच हव्यात. अजून 2-3 दिवस बाकी आहेत. बसून पुन्हा विचार करू आणि त्यानुसार संघ निवडू. या स्तरावर जेव्हा तुम्ही अशा संधी गमावता, तेव्हा कोणीही तुम्हाला सहजासहजी काही देत नाही.’ भारताचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामना 25 जून रोजी होणार आहे. हा सामना खरं तर करो या मरोची लढाई असणार आहे. कारण शेवटचा सामना 28 जूनला ऑस्ट्रेलियाला होणार आहे.
दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वार्ड्ट हिने सांगितलं की, ‘काय जबरदस्त शेवट, काय खेळ! बेंचवर बसलेले आम्ही खूप तणावात होतो. एवढ्या दबावाखाली झालेली ही मी पाहिलेली सर्वोत्तम दुखापत होती. मी आतापर्यंत पाहिलेल्या खेळाडूंमध्ये ती कदाचित मोठ्या सामन्यांमधील सर्वोत्तम खेळाडू आहे. ती माझ्या संघात असल्याचा मला खूप आनंद आहे. आज तिला फारसं बरं वाटत नव्हतं. जर ती असाच खेळणार असेल, तर आशा आहे की तिला रोज बरं वाटणार नाही. मला वाटतं तिच्यात एक स्पर्धात्मक वृत्ती आहे आणि त्यामुळेच ती सर्वोत्तम कामगिरी करते. सुरुवात काही फार चांगली झाली नाही. सुरुवातीलाच आघाडी घ्यायला आवडलं असतं. शेवटच्या क्षणी खूप जास्त मेहनत करावी लागली.’
