IPL 2020 | अश्विनला दोन वर्षात हटवलं, एकही ट्रॉफी न जिंकता कोहली आठ वर्ष कर्णधार का? : गंभीर

| Updated on: Nov 07, 2020 | 12:42 PM

आठ वर्षात एकदाही विजेतेपद न मिळूनही विराटला कायम ठेवण्यात आले, असं परखड मत गंभीरने व्यक्त केलं

IPL 2020 | अश्विनला दोन वर्षात हटवलं, एकही ट्रॉफी न जिंकता कोहली आठ वर्ष कर्णधार का? : गंभीर
Follow us on

नवी दिल्ली : आयपीएलमधील (IPL 2020) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore RCB) आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) पलिकडे जाऊन नवीन कर्णधाराचा पर्याय शोधावा, असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने व्यक्त केलं. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधात सामना गमावल्यानंतर ‘विराट’सेनेचे आयपीएलमधून पॅकअप झाले. ( Gautam Gambhir says RCB must look beyond Virat Kohli for captaincy)

आठ वर्षांपूर्वी जेव्हा विराट कोहलीने कप्तानपदाची धुरा घेतली, तेव्हापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. प्लेऑफसाठी केवळ तीन वेळा संघ पात्र ठरला. गेल्या तीन सिझन्सपैकी दोन वेळा आरसीबी गुणतालिकेत तळाला होता.

“आठ वर्ष एका टूर्नामेंटमध्ये, आणि एकही ट्रॉफी नाही, आठ वर्ष हा खूप मोठा काळ झाला. मला एक कर्णधार सांगा, कर्णधार सोडा, एखाद्या खेळाडूचे नाव सांगा, ज्याला आठ वर्ष मिळाली, पण विजेतेपद न मिळूनही त्याला कायम ठेवण्यात आले. कर्णधाराने जबाबदारी घ्यायला पाहिजे” असं परखड मत गंभीरने ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना व्यक्त केलं.

“आर अश्विनचं काय झालं बघा… दोन वर्ष तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता, रिझल्ट्स मिळाले नाहीत, त्याला हटवलं. आपण एमएस धोनीबद्दल बोलतो, आपण रोहित शर्माबद्दल बोलतो. धोनीने तीन वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या गळ्यात चार वेळा जेतेपदाची माळ पडली आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केल्यामुळे ते इतकी वर्ष कर्णधारपदी कायम आहेत. रोहित शर्माने आठ वर्षात एकदाही आयपीएल जिंकली नसती, तर त्याला हटवलं असतं. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी मोजमापाची वेगवेगळी परिमाणं नसावीत” असंही गंभीर यावेळी म्हणाला.

“विराटकडे पुरेसं नियोजन नसल्याचं एलिमिनेटर सामन्यात दिसलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अख्ख्या टूर्नामेंटमध्ये फलंदाजीसाठी झगडावं लागलं आहे. मधल्या फळीत चांगली कामगिरी करण्यासाठी एबी डिव्हिलीयर्सवर खूप प्रेशर होतं. त्याने पाच अर्धशतकं लगावली, याचा अर्थ सातपैकी दोन-तीन सामने त्याच्यामुळेच जिंकले गेले, पण जेव्ही डिव्हिलीयर्स फेल गेला, तेव्हा आरसीबीही ढेपाळली. गेल्या वेळीपेक्षा यंदा त्यांनी काहीच वेगळं केलं नाही. एका खेळाडूच्या जोरावर तुम्ही प्लेऑफला पात्र ठरता, याचा अर्थ तुम्ही आयपीएलच्या ट्रॉफीचे प्रबळ दावेदार ठरत नाही” याकडे गौतम गंभीरने लक्ष वेधलं. (Gautam Gambhir says RCB must look beyond Virat Kohli for captaincy)

संबंधित बातम्या :

केन विल्यमसनची नाबाद अर्धशतकी खेळी, हैदराबादची बंगळुरुवर 6 विकेट्सने मात

टॉस जिंकताच हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावे अनोखा विक्रम, धोनी-रोहितच्या पंगतीत स्थान

(Gautam Gambhir says RCB must look beyond Virat Kohli for captaincy)