“सेहवाग तुम्हाला मुख्य निवड समितीत हवा असेल, तर..”, हरभजन सिंगने बीसीसीआयची काढली लायकी !

| Updated on: Feb 28, 2023 | 4:47 PM

बीसीसीआयच्या निवड समिती अध्यक्षपद सध्या रितं आहे. चेतन शर्मा यांनी कथित स्टिंग ऑपरेशननंतर राजीनामा दिला आहे. मात्र बीसीसीआयने या बाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

सेहवाग तुम्हाला मुख्य निवड समितीत हवा असेल, तर.., हरभजन सिंगने बीसीसीआयची काढली लायकी !
हरभजन सिंगनं बीसीसीआयला दाखवला आरसा, निवड समितीत सेहवाग हवा असेल तर तुम्हाला...
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : कथित स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआयच्या मुख्य निवड समिती अध्यक्षपदाचा चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. मात्र या बाबत बीसीसीआयने कोणतंच अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. स्टिंग ऑपरेशनमध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि उमेश यादव यांच्यावर गंभीर आरोप केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्या वादावर त्यांनी भाष्य केलं होतं. मात्र या प्रकरणानंतर चेतन शर्मा यांची उचलबांगडी केल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी बीसीसीआय यावर एक चकार शब्द काढण्यास तयार नाही. तसेच अंतरिम निवड समिती अध्यक्षपदी कोणाचीही निवड केलेली नाही. त्यामुळे तात्पुरता भार माजी क्रिकेटपटू निवड समिती सदस्य शिव सुंदर दास यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं बोललं जातं आहे.यावर आता हरभजन सिंगनं तोंडसुख घेतलं आहे.

“जर तुम्ही निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी विरेंद्र सेहवागचा विचार करत असाल तर पगाराचं धोरण निश्चित केलं पाहीजे. निवड समिती अध्यक्षांना किती पगार मिळतो मला माहिती नाही. पण सेहवाग समालोजन आणि इतर क्रिकेटशी निगडीत काम करून त्यापेक्षा जास्त पैसे कमावतो. जर तुम्हाला सेहवाग हवा असेल तर जास्त पैसे मोजावे लागतील. नाही तर तुम्हाला अशा व्यक्तीची निवड करावी लागेल जी व्यक्ती वर्षभर खेळली असेल किंवा मोठं नाव नसेल.”, अशी कानउघडणी हरभजन सिंगने केली.

“जर राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू शकतो तर त्याच ताकदीचा निवड समिती अध्यक्ष असणं गरजेचं आहे.”, असंही हरभजन सिंगने पुढे सांगितलं. मानधनात सुधारणा झाली तर ही जबाबदारी स्वीकारण्यास तू तयार आहेस का? असा प्रश्न हरभजनला विचारल्यावर त्याने लगेचच होकार दर्शवला.

“संघासोबत राहून प्रशिक्षक रणनिती आखत असतो. तसंच निवड समितीचाही महत्त्वाचा रोल आहे. तुम्हाला चांगल्या आणि गुणवंत खेळाडूंची संघासाठी निवड करायची असते. नाहीतर निवड समिती अध्यक्षपदाची काही किंमत नसती.”, असंही हरभजन सिंगने पुढे सांगितलं.

बीसीसीआयच्या निवड समितीत असलेल्या सदस्यावरून टीकेची झोड उठत आहे. भारतीय निवड समितीचे मागील मुख्य निवड समिती अध्यक्षांच्या क्रिकेट कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. चेतन शर्मा (23), सुनिल जोशी (15) आणि एमएसके प्रसाद (6) कसोटी सामने खेळले आहेत.