World Cup 2019 : ICC ने विचारलं, कुणाचा सिक्सर चांगला, सचिन म्हणाला आमची मुंबई!

| Updated on: Jun 19, 2019 | 6:29 PM

रोहित शर्माच्या या शॉटचं सोशल मीडियावर खूप कौतुक झालं. त्याने हा षटकार ठोकताच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. क्रिकेट चाहते ते क्रिकेट समीक्षक सर्वांनीच रोहितच्या या शॉटची तुलना सचिन तेंडूलकरच्या शॉटसोबत केली.

World Cup 2019 : ICC ने विचारलं, कुणाचा सिक्सर चांगला, सचिन म्हणाला आमची मुंबई!
Follow us on

मुंबई : इंग्लंडमध्ये सध्या आयसीसी विश्वचषक 2019 सुरु आहे. यामध्ये गेल्या रविवारी (16 जून) झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सर्वात रोमांचक ठरला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. भारताचा सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात 113 चेंडूत धडाकेबाज 140 धावा काढल्या. यादरम्यान रोहितने एक असा षटकार ठोकला ज्यामुळे सर्वांनाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आठवण झाली. सचिन तेंडुलकरने 2003 मध्ये झालेल्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या चेंडूवर असाच षटकार ठोकला होता.

रोहित शर्माच्या या शॉटचं सोशल मीडियावर खूप कौतुक झालं. त्याने हा षटकार ठोकताच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. क्रिकेट चाहते ते क्रिकेट समीक्षक सर्वांनीच रोहितच्या या शॉटची तुलना सचिन तेंडूलकरच्या शॉटसोबत केली.

रोहितचा शॉट व्हायरल झाल्यानंतर आयसीसीनेही याचा व्हिडीओ आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शेअर केला. यासोबत ‘सचिनचा 2003 चा शॉट की रोहित शर्माचा 2019 चा शॉट. कोणता अधिक चांगला आहे?’, असा प्रश्नही केला.


आयसीसीच्या या ट्वीटवर खुद्द मास्टर ब्लास्टरने एक मजेशीर उत्तर दिलं. ‘आम्ही दोघेही भारतीय आहोत आणि त्यातल्या त्यात आमची मुंबई… त्यामुळे छापा म्हणजे मी जिंकलो आणि काटा म्हणजे तुम्ही हरलात’, असं ट्वीट सचिनने केलं.


भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात; भारताने आपली विजयी परंपरा कायम ठेवली. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात; पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. रोहित शर्माच्या खणखणीत 140 धावा; के. एल. राहुलच्या 57; कर्णधार कोहलीच्या 77 धावांच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या.

भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना पावसामुळे दोन वेळा पवेलियनमध्ये परतावे लागले. अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला सुधारित 40 षटकात 302 धावांचे आव्हान मिळाले. ते आव्हनही पाकला पेलवले नाही आणि पाकिस्तान 40 षटकांमध्ये केवळ 212 धावा करु शकला.

संबंधित बातम्या :

World Cup 2019 : शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर, ऋषभ पंत भारतीय संघात

Eoin Morgan : इयान मॉर्गनचा झंझावात, एकट्याचे 17 षटकार, 71 चेंडूत 141 धावा

भारताविरोधात हरल्यानंतर पाकिस्तानी संघात उभी फूट, ड्रेसिंग रुममध्ये घमासान

‘निर्बुद्ध सरफराज, स्वतःचा डोकं वापरत नाही’, पराभवानंतर शोएब अख्तरचा हल्लाबोल