
टीम इंडियाने काल सेमीफायनल सामन्यात इंग्लंडला हरवून टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच झाली. खरंतर या मॅचमध्ये भारताने 253 धावांचं विशाल लक्ष्य उभं केलं होतं. त्यामुळे टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं. पण अखेरच्या ओव्हरपर्यंत सामना रंगतदार झाला. टीम इंडियाचे कोट्यवधी चाहते टीव्ही समोर बसून शेवटपर्यंत हा सामना पाहत होते. जो सामना टीम इंडिया सहज जिंकेल असं वाटलं होतं. तो टीम इंडियाने अवघ्या 7 धावांनी जिंकला. इंग्लंडने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 246 धावा केल्या. इंग्लंडने इतकी मोठी मजल मारली, त्यात जेकॉब बेथेलची महत्वाची भूमिका होती.
जेकॉब बेथेलने 48 चेंडूत 105 धावा फटकावल्या. यात 8 फोर आणि 7 सिक्स आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये तो रन आऊट झाल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. न्यूझीलंड विरूद्धच्या फायनल मॅचआधी टीम इंडियाच्या गोलंदाजीने चिंता वाढवली आहे. कारण 253 धावांचं विशाल लक्ष्य उभारुनही इंग्लंडची टीम 250 धावसंख्येच्या आसपास पोहोचते ही एक गंभीर बाब आहे. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने वेळीच या समस्येवर मार्ग शोधला पाहिजे. कारण कालच्या सामन्यात लास्ट ओव्हरमध्ये ती कमतरता प्रकर्षाने दिसून आली.
पहिले पाच प्युअर बॉलर वापरले
कॅप्टन सूर्यकुमार यादवने काल इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात एकूण सहा गोलंदाज वापरले. त्यात 19 व्या ओव्हरपर्यंत सूर्याने अर्शदीप सिंह, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल हे पाच प्युअर गोलंदाज वापरले. पण लास्ट ओव्हरमध्ये सूर्याने चेंडू शिवम दुबेच्या हातात दिला. हे न समजण्यासारखं आहे. शिवम दुबे ऑलराऊंडर असला तरी तो गोलंदाज म्हणून या स्पर्धेत पूर्णपणे अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात तो महागडा ठरला.
हे न समजण्यासारखं
मात्र, असं असतानाही सेमीफायनल सारख्या महत्वाच्या सामन्यात सूर्याने त्याच्या हातात चेंडू कसा दिला? इतका मोठा धोका कसा पत्करला? खरंतर त्यावेळी अक्षर पटेलची लास्ट ओव्हर बाकी होती. अक्षर पटेलने वरुण चक्रवर्तीच्या तुलनेत किफायती गोलंदाजी केली होती. अक्षरने 3 ओव्हरमध्ये 35 धावा दिल्या होत्या. तेच वरुणने 4 ओव्हरमध्ये 64 धावा मोजल्या. लास्ट ओव्हरमध्ये इंग्लंडला विजयासाठी 30 धावांची आवश्यकता शिवम दुबेच्या हाती चेंडू दिला. त्याने 1 ओव्हरमध्ये 22 धावा मोजल्या. म्हणजे आठ-दहा रन्स कमी असते, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. अक्षर पटेलची एक ओव्हर बाकी असताना शिवम दुबेच्या हाती चेंडू देणं हे न समजण्यासारखं आहे.