
टी 20 वर्ल्डकपमध्ये रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिक त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे चर्चेत आला आहे. तो भारतासाठी धोकादायक ठरू शकतो असं बोललं जात आहे. उस्मानच्या कामगिरीवर या सामन्याचा निकाल अवलंबून असू शकतो. मात्र आता उस्मान तारिकसह इतरही असे दोन खेळाडू आहेत जे भारताची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू अजंथा मेंडिसने भारताला या खेळाडूंपासून सावध राहण्यास सांगितले आहे. हे खेळाडू कोण आहेत ते जाणून घेऊयात.
अजंथा मेंडिसने उस्मान तारिकसह अबरार अहमद आणि सैम अयुबपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अजंथा मेंडिसने म्हटले की, कोलंबोतील स्टेडियमवर पाकिस्तानचे सर्वात मोठे शस्त्र अबरार अहमद आणि सैम अयुब ही फिरकी जोडी असू शकते. या ठिकाणी कॅरम बॉल बॅक-स्पिनच्या मदतीने टाकल्यास तो स्किट करतो. त्यामुळे त्यांना प्रेमदासा येथील कोरड्या पिचवर नैसर्गिकरित्या फायदा होऊ शकतो. अबरार आणि सैम अयुब हे असे गोलंदाज आहेत जे बॅक-स्पिनवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना पिचचा फायदा मिळू शकतो, त्यामुळे त्यांच्यापासून भारताला सावध रहावे लागणार आहे.
पुढे बोलताना मेंडिसने सांगितले की, टी-20 क्रिकेटमध्ये बॅटर बॉलरचा अंदाज घेण्यात वेळ घालवत नाहीत, ते शक्य तितक्या लवकर मोठे शॉट मारतात. त्यामुळे त्यांना बॅक-स्पिनशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. जेव्हा पिच ड्राय असते तेव्हा चेंडू जास्त स्किट करतो. यामुळे बॅटर बोल्ड आणि एलबीडब्ल्यू होण्याची शक्यता आणखी वाढते. बॅटर कॅरम बॉल ओळखू शकला नाही तर त्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
अजंथा मेंडिसने म्हटले की, अबरार आणि अयुब वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकू शकतात. यांचा योग्य वापर केला तर ते खूप प्रभावी ठरू शकतात. कारण दोघांचेही त्यांच्या व्हेरिएशनवर चांगले नियंत्रण आहे. यामुळे फलंदाज गोंधळात पडू शकतो. जर गोलंदाजाने एकाच षटकात सहा कॅरम बॉल टाकले तर फलंदाजाला त्याची सवय होईल. त्यामुळे हा चेंडू सरप्राईज म्हणून वापरला पाहिजे, त्यामुळे याचा गोलंदाजांना चांगला फायदा मिळेल.