INDvNZ: उर्वरित सामना उद्या होणार, पण पुन्हा पाऊस आल्यावर काय पर्याय?

| Updated on: Jul 10, 2019 | 11:03 AM

आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमधील भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला आहे. हा सामना उद्या (10 जुलै) दुपारी पुन्हा होईल.

INDvNZ: उर्वरित सामना उद्या होणार, पण पुन्हा पाऊस आल्यावर काय पर्याय?
Follow us on

IndvsNZ World Cup Semi Final लंडन : आयसीसी विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमधील भारत विरुद्ध न्यूझीलंडचा आजचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला आहे. हा सामना उद्या (10 जुलै) दुपारी पुन्हा होईल. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडची चांगलीच दमछाक झाली. त्यांना 46.1 षटकात केवळ 211 धावांचा पल्ला गाठता आला. दरम्यान, याचवेळी पावसामुळे सामना थांबवावा लागला. मात्र, पावसाचा जोर इतका होता, की सामना पुन्हा सुरुच झाला नाही.

आजचा सामना उद्या (10 जुलै) राखीव दिवशी होत आहे. मात्र, हा सामना पहिल्यापासून सुरु होणार नाही. उद्याचा सामना 46.1 षटकापासूनच पुढे सुरु होईल. 11 जुलैला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलसाठीही अशाचप्रकारे पावसाचा व्यत्यय लक्षात घेतला आहे. त्या सामन्यासाठी 12 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आलाय.

राखीव दिवसालाही सामना रद्द झाल्यास पुढे काय?

या परिस्थितीमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. गुणतालिकेत भारत सध्या 15 गुणांसह अव्वलस्थानी आहे. जर सामना रद्द होऊन भारताला 1 गुण मिळाला तर भारताच्या खात्यात 16 गुण जमा होतील. दुसरीकडे न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यांना एक गुण मिळाला तर त्यांच्या खात्यात  12 गुण जमा होतील. त्यामुळे सर्वाधिक गुणांमुळे भारत सहज फायनलमध्ये पोहोचेल.

याअगोदरही न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. चार सामने पावसामुळे रद्द झाले होते. परिणामी अनेक संघांना याचा फटका बसला. पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागेल.

फायलन रद्द झाल्यास पुढे काय?

सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो. पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते.