IND vs PAK: पाकिस्तानची पुन्हा जगासमोर नाचक्की, भारतीय संघाने दिला पराभवाचा धक्का
भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल सामना रंगला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा निकाल हा अपेक्षेप्रमाणे भारताच्याच बाजूने लागला, पण सामना हा खूपच रोमाचंकपद्धतीने पार पडला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटलं की चाहत्यांसाठी पर्वणी असते. भारत पाक या महामुकाबल्यासाठी सर्वच चाहते उत्सुक असतात. असाच एक रोमांचक भारत पाक सामना काल रंगला. या सामन्यातही नेहमीप्रमाणे भारतीय संघाचा विजय झाला. भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पाणी पाजलं, झांबियामध्ये खेळल्या जात असलेल्या एशियन लेजेंड्स लीग 2026 च्या दुसऱ्या हंगामात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. माजी दिग्गजांनी भरलेल्या इंडियन रॉयल्स संघाने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तान पँथर्सला दोन गडी राखून पराभूत केले. भारताच्या विजयाचा नायक स्टार अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन होता. धवनने उत्कृष्ट गोलंदाजी करत सामना जिंकून देणारे अर्धशतक झळकावले. इंडियन रॉयल्सचा कर्णधार नमन ओझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान पँथर्सने 20 षटकांत सहा गडी गमावून 167 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार इम्रान नझीर सर्वात आक्रमक ठरला, त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 29 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. दरम्यान, इब्रार हुसेनने 36 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या आणि तौफिक उमरने 23 चेंडूंमध्ये उपयुक्त 39 धावा केल्या. इंडियन रॉयल्सकडून शादाब जकाती आणि सुबोध भाटी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर मनप्रीत गोनी आणि ऋषी धवन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 168 धावांचे लक्ष्य गाठताना इंडियन रॉयल्सची सुरुवात डळमळीत झाली. कर्णधार नमन ओझा अवघ्या चार धावांवर बाद झाला. असद पठाणलाही केवळ नऊ धावा करता आल्या. मात्र, त्यानंतर फलंदाजांनी डाव सावरला आणि 17.3 षटकांत आठ गडी गमावून लक्ष्य गाठले. अष्टपैलू ऋषी धवनने शानदार खेळी करत 32 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांसह सामना जिंकून देणारी 50 धावांची खेळी केली.
सुबोध भाटीनेही फलंदाजीने जोरदार प्रभाव पाडला आणि 29 चेंडूंमध्ये तीन चौकार व चार षटकारांसह 46 धावांची वेगवान खेळी केली. दरम्यान, अभिषेक जलोटाच्या 19 चेंडूंतील 30 धावा आणि त्यानंतर अनरीत सिंगच्या 4 चेंडूंतील नाबाद 12 धावांच्या जोरावर संघाने विजय मिळवला. लीग 30 जुलै रोजी सुरू झाली असून, अंतिम सामना 10 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. भारतीय संघाने बांगलादेश टायगर्सला 19 धावांनी पराभूत करून आपल्या मोहिमेची सुरुवात केली आणि आता पाकिस्तानवर विजय मिळवून स्पर्धेत सलग दुसरे यश संपादन केले आहे. दरम्यान, पाकिस्तान पँथर्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
Follow Us
