Ind vs SA 2nd ODI : टॉसपासून कॅचपर्यंत सर्वच गंडलं; या 4 कारणांमुळे टीम इंडियाने गमावली दुसरी वनडे

भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. रायपूरमध्ये झालेल्या या पराभवामागे 4 प्रमुख कारणं होती. गोलंदाजांनी निराशा केली, पण सामन्यातील चार चुका सर्वात महागात पडल्या. त्यातील एक चूक तर सर्वाधिक महागात पडली. याच कारणामुळे भारताच्या हातातून सामना निसटला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आली. आता तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.

Ind vs SA 2nd ODI : टॉसपासून कॅचपर्यंत सर्वच गंडलं; या 4 कारणांमुळे टीम इंडियाने गमावली दुसरी वनडे
358 धावा करूनही भारत का हरला ?
Image Credit source: Getty Images
Updated on: Dec 04, 2025 | 8:40 AM

रायपूर येथे बुधवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताला चार गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे सीरीज 1-1 अशी बरोबरीत झाली आहे. या वनडे सीरीजचा निकाल शनिवारी विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याने होणार आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय सामना अत्यंत रोमांचक होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया कालच्या मॅचचा बदला घेणार की हाराकिरी करणार हे शनिवारीच स्पष्ट होणार आहे. काल टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. डोंगरासारखा स्कोअर दक्षिण आफ्रिकेची टीम पार करेल असं वाटत नव्हतं. पण दक्षिण आफ्रिकेने हे करून दाखवलं. विशाल स्कोअरचाही कसा पाठलाग करावा याचा वस्तूपाठही घालवून दिला. तर चार मेजर चुकांमुळे भारताने आपला हातातील सामना गमावला.

टीम इंडियाने रायपूरच्या मैदानात चार चुका केल्या. त्यामुळे हातातील सामना गमावण्याची वेळ आली. तसेच या सामन्यात यशस्वी जायस्वाल हा व्हिलन ठरला. जायस्वालने मार्करमचा झेल सोडला आणि सामन्याचा रंगच पालटला. हातातील सामना टीम इंडियाने गमावून टाकला. नेमक्या कोणत्या चुका झाल्या? त्यावर टाकलेला हा प्रकाश.

1. पेसरकडून अपेक्षाभंग

नंतर तुलनेने सोपी झालेल्या रायपूरच्या पिचवर वेगवान गोलंदाजांनी खूप प्रयत्न केले, पण ते शतकवीर मार्करमला रोखू शकले नाहीत. प्रसिद्ध कृष्णाने मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये दम दाखवत विकेट घेतल्या, पण राणा आणि अर्शदीप मात्र प्रभावी ठरू शकले नाहीत. प्रसिद्ध कृष्णा फॉर्मात असलेल्या फलंदाजांना आव्हान देत होता.

स्लॉग षटकांत प्रथम प्रसिद्ध कृष्णाने झंझावाती अर्धशतकी खेळी करणाऱ्या ब्रीट्झेला बाद केले आणि पुढच्याच षटकात अर्शदीपनं मार्को जान्सनला बाद करताच भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. पण त्या वेळी आवश्यक धावगती खूपच कमी झाली होती. त्यामुळे 5 चेंडूंच्या आत पडलेली ही दोन विकेट्स दक्षिण आफ्रिकेवर फारसा परिणाम करू शकले नाही.

2. स्पिनरही प्रभावहीन

या दुसऱ्या वनडेत स्पिनरकडूनही फारशी मोठी कामगिरी झाली नाही. स्पिनरांनी प्रयत्न खूप केले, त्यांनी वैविध्य राखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

3. यशस्वी जायसवालची मोठी चूक

शतकवीर मार्करमला फ्लॉप ठरलेल्या यशस्वी जायसवालने दिलेलं जीवनदान खूपच महागात पडलं. कुलदीप यादवने टाकलेल्या 18व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मार्करमने हवेत शॉट खेळला. जायसवाल उजव्या बाजूला धावला, पण योग्य तो योग्य पोझिशन घेऊ शकला नाही. त्यामुळे झेल सुटला आणि थेट षटकारात गेला. तेव्हा मार्करम 53 धावांवर खेळत होता. नंतर 110 धावा करणाऱ्या मार्करमचा तो झेल भारताला तब्बल 57 धावांनी महागात ठरला. म्हणजे तो कॅच सुटल्यानंतर मार्करमने 57 धावांची झंझावाती खेळी केली. आणि मार्करमची हीच खेळी भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरली. जर यशस्वी जायसवालने तो झेल पकडला असता, तर सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता अधिक होती.

4. टॉस बनला बॉस

दुसरा सामना रोमांचक बनवूनही टीम इंडिया जिंकू शकली नाही. या पराभवात टॉसचीही मोठी भूमिका होती. जर भारत टॉस जिंकला असता, तर टीम इंडियाने प्रथम गोलंदाजीचाच निर्णय घेतला असता, कारण नंतर पडणाऱ्या दवामुळे दुसऱ्या डावात कोणीही गोलंदाजी करायला प्राधान्य देत नाही. त्यामुळे टॉसनं भारताच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली.