पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यापेक्षा, खेळून हरवा: सुनील गावसकर
नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्याची मागणी देशभरातून होत आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्येही पाकिस्तानसोबत भारताने क्रिकेट सामना खेळू नये, अशी मागणी होत आहे. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी या मागणीला विरोध केला आहे. जर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळला नाही, तर नुकसान भारताचंच होईल, असं सुनील गावसकर म्हणाले. 2019 च्या क्रिकेट […]
नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्याची मागणी देशभरातून होत आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्येही पाकिस्तानसोबत भारताने क्रिकेट सामना खेळू नये, अशी मागणी होत आहे. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी या मागणीला विरोध केला आहे. जर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळला नाही, तर नुकसान भारताचंच होईल, असं सुनील गावसकर म्हणाले.
2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला बाहेर ठेवण्यास अन्य देश सहमत झाले नाहीत तर भारताचं नुकसान होईल, असं गावसकर यांनी नमूद केलं.
“विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. भारताने तो सामना खेळला नाही तर पाकिस्तानला फुकटचे 2 गुण जातील. त्यापेक्षा त्यांच्याविरोधात मॅच खेळून त्यांना हरवणं उत्तम”, असं गावसकर म्हणाले.
वन डे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मँचेस्टर इथं सामना खेळवण्यात येणार आहे. भारताने विश्वचषकात पाकिस्तानला नेहमीच हरवलं आहे.
बीसीसीआयचे प्रशासक विनोद राय यांनी सीईओ राहुल जोहरी यांना आयसीसीला पत्र पाठवून पाकिस्तानला विश्वचषकातून हटवण्यास सांगितलं आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातील जनता खवळली आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामने खेळू नये अशी मागणी होत आहे. तसंच पाकिस्तानला वर्ल्डकपमधून हटवण्यासाठी बीसीसीआयने दबाव आणावा अशीही मागणी होत आहे.
येत्या 27 फेब्रुवारीला ICC च्या प्रस्तावित कार्यक्रमात राहुल जोहरी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करु शकतात. पाकिस्तान सतत दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याने त्यांना विश्वचषकातून बाहेर काढावं, अशी मागणी ते करण्याची शक्यता आहे.