IPL : सुरुवातीला 2 सामन्यात शून्यावर बाद, नंतर लागोपाठ 3 अर्धशतकं, ऋतुराज गायकवाडची सेहवागशी बरोबरी

| Updated on: Nov 02, 2020 | 9:59 AM

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नईने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवत चांगली सुरुवात केली होती. परंतु पुढील सामन्यात चेन्नईचा संघ सातत्याने अपयशी ठरला.

IPL : सुरुवातीला 2 सामन्यात शून्यावर बाद, नंतर लागोपाठ 3 अर्धशतकं, ऋतुराज गायकवाडची सेहवागशी बरोबरी
Follow us on

अबुधाबी : इंडियन प्रिमियर लीगमध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab ) या सामन्यात चेन्नईने पंजाबवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे विजयी आव्हान 9 विकेट्स राखून 18.5 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. ऋतुराजने 49 चेंडूत नाबाद 62 धावांची नाबाद खेळी केली. ऋतुराजने याखेळीत 6 चौकार आणि एक षटकार लगावला. तर फॅफ डु प्लेसिसने 34 चेंडूत 4 चौकार आणि दोन षटकारांसह 48 धावा केल्या. पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने एकमेव विकेट घेतली.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सीएसकेने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवत चांगली सुरुवात केली होती. परंतु पुढील सामन्यात चेन्नईचा संघ सातत्याने अपयशी ठरला. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचे आव्हान सर्वात आधी संपुष्टात आलं. 11 सामन्यात 6 गुण मिळवणाऱ्या चेन्नईसाठी उर्वरित सामने औपचारिकता बनले होते. या सामन्यांमध्ये तरुण खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिली जाईल असे संघाचे कोच स्टीफन फ्लेमिंग आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी सांगितले होते. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडला संघाने शेवटचे सामने खेळण्याची संधी दिली.

आधी कोरोना आणि नंतर दोन सामन्यांमध्ये शून्यावर बाद

23 वर्षीय ऋतुराज गायकवाड याला स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून बरा होऊन परतल्यानंतर ऋतुराजला तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. परंतु त्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाला. त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात आली नाही. परंतु शेवटचे तीन सामने खेळण्यासाठी ऋतुराजला संघ व्यवस्थपानाने पुन्हा संधी दिली. यावेळी मात्र ऋतुराजने संधीचं सोनं केलं.

संधी मिळालेल्या तिन्ही सामन्यात ऋतुराजने अर्धशतकं लगावली आहेत. त्यापैकी दोन वेळा तो नाबाद राहिला. सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध ऋतुराजने नाबाद 65 धावा फटकावल्या, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 72 धावांचं योगदान दिलं. 1 नोव्हेंबर रोजी पंजाबविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऋतुराजने नाबाद 62 धावांची खेळी केली. यासोबत त्याने सहा सामन्यांमध्ये 120.71 च्या सरासरीने 204 धावा केल्या आहेत.

लागोपाठ तीन अर्धशतकं आणि तीन प्लेअर ऑफ दी मॅच

लागोपाठ तीन अर्धशतकं ठोकणारा ऋतुराज हा चेन्नईचा पहिलाच खेळाडू आहे. यापूर्वी चेन्नईच्या कोणत्याही फलंदाजाला असा कारनामा करता आला नाही. दरम्यान ऋतुराज लागोपाठ तीनवेळा प्लेअर ऑफ मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. असा पराक्रम करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी विरेंद्र सहवाग आणि विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या

अंपायरचा तो निर्णय आणि 43 दिवसांपूर्वीच्या मॅचमुळे आम्ही स्पर्धेबाहेर, KL राहुलने सांगितली ‘हार की बात’!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ‘हिटमॅन’ला वगळण्याचे कारण रवी शास्त्रींनी उलगडले

IPL 2020 : रोहित शर्माच्या कमबॅकबाबत कायरन पोलार्डचं मोठं वक्तव्य

(IPL 2020 : Ruturaj Gaikwad hit 3 consecutive fifties and won 3 back to back player of the match award)