WTC 2021 : काही दिवस पाणी द्यायला, बेंचवर बसायला ठीक आहे, पण आता बस्स, कुलदीप यादव हळहळला

| Updated on: May 12, 2021 | 1:03 PM

WTC आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) स्थान देण्यात आलेलं नाहीय. यानंतर कुलदीप यादव खूपच निराश झालाय. 'खरंच मी एवढा वाईट आहे...?', असा उद्विग्न सवाल त्याने उपस्थित केला आहे.

WTC 2021 : काही दिवस पाणी द्यायला, बेंचवर बसायला ठीक आहे, पण आता बस्स, कुलदीप यादव हळहळला
कुलदीप यादव
Follow us on

मुंबईवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final) अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या भारतीय संघात स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) स्थान देण्यात आलेलं नाहीय. यानंतर कुलदीप यादव खूपच निराश झालाय. ‘खरंच मी एवढा वाईट आहे…?’, असा उद्विग्न सवाल त्याने उपस्थित केला आहे. (kuldeep yadav Expressed heartache After Not Selected WTC 2021 India vs England)

कुलदीपच्या मनातील खदखद

भारतीय संघात संधी नाकारल्यानंतर कुलदीप यादवने न्यूज 18 ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मनातली खदखद मांडली. जेव्हा एखादा खेळाडू सतत खेळत असतो तेव्हा त्या खेळाडूच्या मनात अधिक आत्मविश्वास असतो. पण तुम्ही जेवढे अधिक बॅक बेंचवर बसाल तितके अधिक खेळणे पुढील काळात कठिण होते. मी जेव्हा फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटी खेळलो होतो तेव्हा माझ्यावर खूप दबाव होता. कोरोनामुळे, गेल्या एका वर्षापासून काहीही चांगलं घडत नसताना, गोष्टी अधिक कठीण झाल्यात.

“कधीकधी मला वाटतं, हे आपल्यासोबत काय होतंय…?”

“कधीकधी मला वाटतं, हे आपल्यासोबत काय होतंय, याचा वारंवार माझ्या मनात विचार येतो. काळ अतिशय कठीण आहे. कधी कधी माझं मन म्हणतं तू आता पहिला कुलदीप राहिला नाही. कारकीर्दीतले काही दिवस असे असतात की जेव्हा तुम्हाला पाणी द्यायला आणि बेंचवर बसणं चांगले वाटतं, परंतु काही दिवस असे असतात जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी अजिबात रहायचे नसतं…”, अशा भावना कुलदीपने व्यक्त केल्या.

इंग्लंड दौऱ्याआधी कुलदीप यादव 2 वर्षांपासून कसोटी क्रिकेटची दारं उघडी व्हावीत म्हणून वाट पाहत राहिला. अखेर त्याला भारतीय कसोटी संघात संधी मिळाली पण ती काही मोजक्या मॅचेसपुरतीच… आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कुलदीपला स्थान मिळेल, असं वाटत असतानाच बीसीसीआयने त्याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष केलं!

बीसीसीआयच्या करारात कुलदीपचा भ्रमनिरास, क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह?

बीसीसीआयने यावर्षी खेळाडूंरोबर केलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्येही कुलदीपचा भ्रमनिरास झालाय. कुलदीप अगोदर ए ग्रेडमध्ये होता, म्हणजेच त्याला 5 कोटी रुपये इतकं मानधन मिळत होतं. मात्र या वर्षीच्या करारामध्ये ए ग्रेडवरुन त्याची वर्णी थेट सी ग्रेडमध्ये लावण्यात आलेली आहे. म्हणजेच त्याला आता केवळ 1 कोटी रुपये इतकं मानधन मिळणार आहे.

कॅप्टल कूल संघात असताना त्याच्या नेतृत्वाखाली कुलदीप यादव चांगली कामगिरी करत होता. मात्र जशी धोनीने निवृत्ती घेतली, त्याचा परिणाम कुलदीपच्या क्रिकेट करिअरवर झालेला पाहायला मिळतोय. धोनीच्या रिटायरमेंटनंतर कुलदीप म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. कदाचित त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे बीसीसीआयला त्याला सी ग्रेडमध्ये टाकावं लागलं किंबहुना खेळांडूंच्या परफॉर्मन्सच त्यांच्या कॅटॅगरी ठरवत असतो.

(kuldeep yadav Expressed heartache After Not Selected WTC 2021 India vs England)

हे ही वाचा :

आयपीएलमध्ये झालेली ‘ही’ चूक BCCI पुन्हा करणार नाही, उचललं कठोर पाऊल

क्रिकेटच्या मैदानात असतानाच वडिलांच्या निधनाची बातमी कळाली, आता म्हणतो, ‘विराट भैय्याचे माझ्यावर उपकार’

असं काय झालं की ख्रिस गेल धाय मोकलून रडायला लागला? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल