One Day Match : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ वक्तव्याची जडेजाने घेतली फिरकी, म्हणाला..
50 मर्यादित वनडे सामन्याबाबत आजी माजी खेळाडूंनी चिंता व्यक्त केली आहे. 15-40 षटकांमधील खेळ बोरिंग होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे फॉर्मेट बदलणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिले दोन सामने 40 षटकांच्या आतच संपले. पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियान 35.4 षटकात 188 धावा करत 189 धावांचं आव्हान दिलं. हेआव्हान भारतीय संघाने 39.5 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा संपूर्ण संघ 26 षटकात 117 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 118 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 11 षटकात एकही गडी न गमवता पूर्ण केलं. वनडे क्रिकेट बोरिंग होत असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपलं मत मांडलं होतं.
“सध्याच्या स्थितीत 15 ते 40 षटकांमधील खेळ बोरिंग होत आहे. त्यामुळे 100 षटकांचा हा सामना 25-25 षटकात कसोटीसारखा खेळवावा.”, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितलं होतं. आता यावार माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने मिश्किल टिपणी केली आहे.
क्रिकबजसोबत बोलताना जडेजाने सांगितलं की, “असं वाटतं की संघ सामना 40 षटकांपर्यंत घेऊ जाऊ इ्च्छित नाही. सचिनच्या वक्तव्यावर कोणतीच शंका नाही.”, असं अजय जडेजाने सांगितलं.”तेंडुलकर साहेबांनी सांगितलं की 15 ते 40 षटकांमधील सामना बोरिंग होत आहे. पण इथे तर खेळाडूच सांगत आहेत आम्ही 40 षटकांपुढे खेळणार नाही.” असं अजय जडेजाने पुढे सांगतिलं.
“एकदिवसीय क्रिकेट एकेकाळी 30 यार्डच्या वर्तुळाशिवाय होत होतं. तुम्ही नऊ क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर फिल्डिंगला पाठवू शकत होतात. ते कंटाळवाणं झालं म्हणून वर्तुळाची संकल्पना आली.” असं जडेजाने एकदिवसीय क्रिकेटबाबत सांगितलं. “ऑस्ट्रेलियातील स्थिती पाहता दोन नवे चेंडू वापरण्याची पद्धत आली. पूर्वी लाल चेंडूने एकदिवसीय सामने खेळले जायचे.” असं अजय जडेजाने लक्ष वेधत सांगितलं.
माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनीही वनडे क्रिकेटबाबत आपलं मत नोंदवलं होतं.वनडे सामना 50 ऐवजी 40 षटकांचा करण्याचा सल्ला दिला होता. तसेच एका काळी हा सामना 60 षटकांचा होत होता याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. 1983 सालचा वर्ल्डकप 60 षटकांचा होता. मात्र त्यानंतर आता 50 षटकांचे वनडे सामने होत आहेत.
भारताचं वनडेतील नंबर वन स्थान धोक्यात
वनडे फॉर्मेटमध्ये टीम इंडिया सध्या नंबर 1 वनडे संघ आहे. भारताने 44 सामन्यात 5010 पॉईंट्सने 114 गुण कमावले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 32 सामन्यात 3572 पॉईंट्ससह 112 गुण कमावले आहेत. चेन्नईमध्ये भारता पराभव झाल्यास टीम इंडियाला नंबर 1 स्थान गमवावे लागेल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाचे 113-113 रेटिंग पॉइंट्स होतील. कांगारु टॉपवर असतील. कारण पॉइंटच्या फरकाने ते पुढे असतील. भारताला आपलं नंबर 1 स्थान टिकवायच असेल, तर त्यांना चेन्नईत जिंकावच लागेल.