‘हे न खपणारे आहे’, आशिया कपसाठी पाकिस्तानी टीम भारतात येणार, नव्या राड्याचे संकेत
आशिया कपसाठी पाकिस्तानी टीमला भारतात येण्याची परवानगी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यावरुन नवीन राड्याचे संकेत मिळत आहेत. "त्यांनी धर्म विचारून आपली माणसे मारायची आणि केंद्र सरकारने पाकिस्तानी संघ खेळायला बोलवायचे!" अशा प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

पुढच्या महिन्यात पाकिस्तानचा पुरुष हॉकी संघ भारतात येऊ शकतो. पाकिस्तानच्या पुरुष हॉकी संघाचा भारतात येण्याचा मार्ग रोखण्यात येणार नाही. आशिया कप 2025 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा पुरुष हॉकी संघ येणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने क्रीडा मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. आशिया कप आणि ज्यूनियर हॉकी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी हॉकी टीम भारतात येऊ शकते. बिहार राजगीर येथे 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धा रंगणार आहे.
“बहुराष्ट्रीय स्पर्धेसाठी कुठली टीम भारतात येत असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. द्विपक्षीय मालिका वेगळी गोष्ट आहे” असं सूत्रांनी सांगितलं. “आंतरराष्ट्रीय स्पर्धेत असा कोणाला रोखण्याचा निर्णय घेता येत नाही. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. पण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ते खेळताना दिसतात” असं या सूत्राने सांगितलं. नवी दिल्लीत सप्टेंबरमध्ये शूटिंगचा ज्यूनियर वर्ल्ड कप होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये वर्ल्ड पॅरा अॅथलिटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुद्धा आहे. मंत्रालयाच्या भूमिकेमुळे पाकिस्तानी खेळाडूंचा सहभागाचा मार्ग मोकळा झालाय.
मग, क्रिकेट संघाला परवानगी मिळणार का?
बहुराष्ट्रीय स्पर्धामध्ये प्रतिस्पर्धी देशाला सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तर यजमान देशाला पुन्हा भविष्यात यजमानपदाची संधी मिळण्याची शक्यता कमी होते. याचा अर्थ सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची परवानगी मिळणार का?. त्यावर BCCI अजून हा विषय घेऊन मंत्रालयापर्यंत आलेली नाही असं उत्तर मिळालं.
‘पाकिस्तानी टीमला पायघड्या घातल्या’
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. पाकिस्तानची लढण्याची सगळी खुमखुमी उतरवली. भारतीयांच्या मनात अजूनही पहलगामच्या आठवणी ताज्या आहेत. पाकिस्तानबद्दल संतापाची भावना आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावर कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
“त्यांनी धर्म विचारून आपली माणसे मारायची आणि केंद्र सरकारने पाकिस्तानी संघ खेळायला बोलवायचे! पहलगाम हल्ल्यातील लोकांचे रक्तही वाळले नसेल अजून की केंद्राने पाकिस्तानी टीमला पायघड्या घातल्या. असे असेल तर हे न खपणारे आहे. #ऑपरेशन_सिंदूर नंतर हेच यांचे ‘न्यू नॉर्मल’ आहे का?” असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारलाय.
