रोहित शर्माच्या शतकाने ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाची बरोबरी

| Updated on: Jun 06, 2019 | 6:27 PM

विश्वचषकाच्या पहिल्या विजयासोबत भारतीय संघाने आणखी एका विक्रमावर आपले नाव नोंदवले आहे. विशेष म्हणजे या विक्रमामुळे भारतीय संघाने चक्क ऑस्ट्रेलियन संघाशी बरोबरी केली आहे.

रोहित शर्माच्या शतकाने ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाची बरोबरी
Follow us on

लंडन : हिट मॅन रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर यंदाच्या विश्वचषकात भारताने विजयी सलामी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्स राखत भारताने मात करत या विश्वचषकातला पहिला विजय नोंदवला. या विजयासोबत भारतीय संघाने आणखी एका विक्रमावर आपले नाव नोंदवले आहे. विशेष म्हणजे या विक्रमामुळे भारतीय संघाने चक्क ऑस्ट्रेलियन संघाशी बरोबरी केली आहे.

काल (5 जून) आयसीसी विश्वचषकात भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. इंग्लंडमधील साऊदम्पटन इथं हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात  दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅप ड्युप्लेसी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विश्वचषकाच्या पहिल्या लढाईत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने 50 षटकात 228 धावांत रोखलं. त्यामुळे भारताला विजयासाठी 229 धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाचा भारताने 6 विकेट्स राखून यशस्वी पाठलाग केला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

यात रोहित शर्माने सर्वाधिक नाबाद 122 धावांचं योगदान दिलं. रोहित शर्माचं विश्वचषकातलं हे दुसरं शतक आहे. विश्वचषकाच्या इतिहासात सर्व टीम मिळून आतापर्यंत 167 शतकांची नोंद होती. मात्र रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे ही संख्या वाढून 168 झाली आहे. तसेच रोहित शर्माच्या नाबाद 122 धावांमुळे भारतीय टीमच्या नावे 26 शतकांची नोंद झाली आहे.

दरम्यान विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या टीममध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. त्यांनी आतापर्यंत 26 शतकी खेळी केल्या आहेत. मात्र काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हिट मॅन रोहितच्या शतकी खेळीमुळे त्यात बरोबरी झाली आहे. त्यामुळे भारत 26 आणि ऑस्ट्रेलिया 26 इतक्या शतकांची नोंद झाली आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात आता शतकांची शर्यत लागण्यास सुरुवात होणार आहे.

दरम्यान वर्ल्डकपचा हा थरार दिवसेंदिवस रंगत जाणार आहे. मात्र या विश्वचषकात शतकाचा बादशाह कोण ठरणार, हे आपल्याला विश्वचषकाच्या शेवटच्या सामन्यात समजेल.