
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आज गुरुवार 26 फेब्रुवारीचा दिवस भारतीय क्रिकेट टीमसाठी खूप महत्वाचा आहे. टीम इंडियाच या वर्ल्ड कपमधील अभियान पुढे सुरु राहणार की संपणार? ते चित्र आज स्पष्ट होईल. टीम इंडियाला वर्ल्ड कप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्याशिवाय टीम इंडिया गतविजेता संघ आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया आज झिम्बाब्वे विरुद्ध सुपर-8 राऊंडमधील दुसरा सामना खेळणार आहे. टीम इंडियाला सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून रहायचं असेल, तर काहीही करुन विजय हा हवाच. पण या विजयाआधी टीम इंडियासाठी पहिले चार तास जास्त महत्वाचे आहेत. तिथे नशिबाची टीम इंडियाला साथ मिळणं जास्त गरजेच आहे.
भारत आणि झिम्बाब्वे ग्रुप-1 मध्ये आहे. दोन्ही टीम्समध्ये सुपर-8 राऊंडमधील सामना गुरुवारी संध्याकाळी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होईल. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा चेन्नईच्या मैदानावर हा पहिला सामना होत आहे. झिम्बाब्वे सुद्धा या मैदानात आपला पहिला सामना खेळण्यासाठी उतरेल. दोन्ही टीम्ससाठी सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक आहे, तो सुद्धा मोठ्या फरकाने. कारण सुपर-8 राऊंडच्या पहिल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून आणि झिम्बाब्वेचा वेस्ट इंडिजने पराभव केला.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांच्या नजरा असतील
या मॅचच्या आधी चेन्नईपासून 1800 किलोमीटर अंतरावर जे होणार आहे, त्यावर भारतीय टीम आणि भारतीय चाहत्यांच्या नजरा असतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांच्या नजरा असतील. भारत-झिम्बाब्वे सामन्याआधी ग्रुप-1 मधीलच दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिजचा सामना इथे होईल. ग्रुप-1 च्या पॉइंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दोन्ही टीम्स टॉपवर आहेत. त्यांचे प्रत्येकी 2-2 पॉइंट आहेत. सेमीफायनलासाठी या दोन्ही टीम्सना सुद्धा विजय आवश्यकच आहे. पण या मॅचचा निकालाचा भारतीय टीमचं टुर्नामेंटमध्ये काय भविष्य असेल, त्यावर सुद्धा काही प्रमाणात परिणाम होईल.
मग, रनरेटला फार महत्व उरणार नाही
टीम इंडिया या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची प्रार्थना करेल. सुपर-8 राऊंडच समीकरणच असं बनलय की, दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला आणि भारताने झिम्बाब्वेला हरवलं, तर ग्रुप-1 मधून सेमीफायनलमध्ये कोण प्रवेश करणार याचा निर्णय भारत-वेस्ट इंडिज सामन्याने होईल. मग, रनरेटला फार महत्व उरणार नाही.
मग अशावेळी निर्णय रनरेटने होईल
वेस्ट इंडिज जिंकल्यास भारतीय टीमचा मार्ग कठीण होईल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध होईल. त्यात दक्षिण आफ्रिकेचं पारड जड असणं स्वाभाविक आहे. अशावेळी आज वेस्ट इंडिजने मॅच जिंकली आणि भारताने झिम्बाब्वेला हरवलं, त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि भारताने आपले शेवटचे सामने जिंकले, तर भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी 4-4 पॉइंट होतील. मग अशावेळी निर्णय रनरेटने होईल.