IND vs ZIM : झिम्बाब्वेने हरवलं तर भारताला गुंडाळावा लागणार गाशा ? वर्ल्डकपमधून पत्ता कट ? समजून घ्या ‘जर-तर’चं गणित
T20 World Cup Team India Performance : भारतासाठी आजचा सामना करो या मरो चा आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध जर पराभव पत्करावा लागला तर टीम इंडिया टी20 वर्ल्डकपच्या बाहेर पडणार का ? सुपर 8 आणि सेमीफायनलमचं संपूर्ण गणित समजून घ्यायचं असेल तर हे नक्की वाचा.

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज रंगणाऱ्या भारत वि. झिम्बाब्वे या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे, आजचा सामना हा ‘नॉकआउट’ ठरू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यामुळे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा रस्ता अतिशय कठीण झाला आहे. जर आज सिकंदर रजाच्या टीमने काही उलटफेर केला, तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियावर टूर्नामेंटमधून बाहेर पडण्याचं संकट घोंगावू लागेल. पण असं असलं तरी भारताचं नशीब हे केवळ त्याच्या विजयावर नव्हे तर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या होणाऱ्या सामन्याशीही निगडीत आहे. ‘जर-तर’ च्या या जाळ्यातून निघून टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारू शकेल की माजी विजेत्यांना गाशा गुंडाळावा लागेल ? पॉईँट्स टेबलंच संपूर्ण गणित समजून घेऊया.
आज जर झिम्बाब्वेने भारताला हरवलं आणि जर आजच अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर भारत टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडेल. वेस्ट इंडिजच्या विजयामुळे त्यांचे 4 गुण होतील, तर दक्षिण आफ्रिकेचे 2 गुण राहतील आणि भारताविरुद्धच्या विजयामुळे झिम्बाब्वेलाही 2 गुण मिळतील. त्यामुळे भारत हा शून्यासह चौथ्या स्थानी असेल. अशा परिस्थितीत, शेवटच्या सामन्यात जरी भारताने वेस्ट इंडिजला हरवले तरी टीम इंडियाचे जास्तीत जास्त 2 गुण होतील. तर त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांचा शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध असल्याने, त्यापैकी एक संघ 2 गुणांनी पुढे जाईल, जे भारताला शक्य होणार नाही.
पराभवानंतरही भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ?
पण जर आज वेस्ट इंडिजचा संघ दक्षइण आफ्रिकेकडून पराभत झाला तर मात्र भारतासाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद नसतील, टीम इंडियाच्या आशा जिवंत राहतील. दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला तर त्यांचे 4 गुण होतील, तर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचे प्रत्येकी 2 गुण होतील. जर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला हरवले तर ते 6 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचतील. या परिस्थितीत झिम्बाब्वेचा संघ 2 गुणांवरच अडकून पडेल. त्यानंतर रविवारी जर, भारताने कोलकाता येथे वेस्ट इंडिजचा पराभव केला तर भारत, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचे प्रत्येकी 2-2 -2 गुण होतील.
नेट रन रेटने ठरेल निर्णय
मग हा निर्णय नेट रन रेट (NRR) वर आधारित असेल. सध्या, भारताचा NRR (-3.800) खूपच खराब आहे, तर वेस्ट इंडिज (+5.350) मजबूत स्थितीत आहे. मात्र, वेस्ट इंडिजच्या सलग दोन पराभवांमुळे त्यांचा रन रेट कमी होऊ शकतो, ज्यामुळे भारतासाठी संधी निर्माण होऊ शकते. पण भारत स्पर्धेतून बाहेर पडू शकतो अशी आणखी एक परिस्थिती उद्भवू शकते. जर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवले, परंतु झिम्बाब्वेने त्यांचे उर्वरित (भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) हे दोन्ही सामने जिंकले, तर झिम्बाब्वे 4 गुणांसह पुढे जाईल. अशा परिस्थितीत, वेस्ट इंडिजला हरवूनही भारत स्पर्धेबाहेर पडेल, कारण दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचे भारतापेक्षा जास्त गुण असतील. त्यामुळे आजच्या आणि येत्या सामन्यात भारताला प्रचंड जोर लावून खेळावं लागेल आणि विजय मिळवू स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवावंच लागेल.
